नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज झालेल्या चर्चेमध्ये भारतात नुकताच मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर कोनतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती विदेश सचिव हर्ष वर्धन श्रृंगला यांनी सांगितले. या दोन्ही नेत्यांनी धार्मिक सौहार्दाच्या मुद्दयावर सकारात्मक चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
या चर्चेमध्ये सुरक्षा, संरक्षण, उर्जा, तंत्रज्ञान आणि नागरिक ते नागरिकांमधील थेट संवाद या प्रमुख पाच मुद्देयांचा समावेश होता. ट्रम्प यांनी संरक्षण क्षेत्रातील उच्च दर्जाच्या सामुग्री उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली असल्याचेही श्रृंगला यांनी सांगितले.
मोदी आणि ट्रम्प यांनी व्यापार क्षेत्रातील मोठ्या व्यवहाराच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापारावरील सुरू असलेल्या चर्चा लवकरात लवकर संपवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या संदर्भातील निर्णयाला कायद्याच्या चौकटीमध्ये बसवण्यात यावे आणि त्यातील तरतूदींना लवकरात लवकर अंतिम स्वरुप देण्यात यावे यावरही सहमती झाली असल्याचेही श्रृंगला यांनी सांगितले.
“सीएए’ आणि “एनआरसी’विरोधात देशभर भडकलेल्या आंदोलनाबाबत चर्चा झाली नसल्याचे श्रृंगला यांनी स्पष्ट केले. मात्र धार्मिक स्वातंत्र्याबाबत दोन्ही बाजूंनी विविधता आणि भिन्नतेबद्दल आदर व्यक्त केला. हे दोन्ही मुद्दे दोन्ही देशांसाठी सामायिक असल्याचे मत दोन्ही नेत्यांनी व्यक्त केल्याचे श्रृंगला यांनी सांगितले.
ट्रम्प यांनी अहमदाबादेतील भाषणातही धार्मिक वैविध्य आणि सौहार्दाचा मुद्दा उपस्थित केला होता. हे वैविध्य आणि सौहार्द भारतात बघायला मिळते. यामुद्दयावर जेवढे शक्य होती, तेवढी चर्चा झाली असल्याचे श्रृंगला यांनी पत्रकारांन सांगितले.
दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत पाकिस्तान सीमेपलिकडील दहशतवादाविषयी भारताने आपली भूमिका मांडली. दोन्ही देशांनी अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी एक कृतीगट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच “होमलॅन्ड सिक्युरिटी’ विषयक संवाद प्रक्रियेचे पुनरुजीवन करण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे श्रृंगला यांनी सांगितले.
ट्रम्प आणि मोदी यांच्यातील चर्चेमध्ये उर्जा सहकार्याचा विषय प्रमुख होता. 2020 मध्ये अमेरिकेकडून 9 अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात केली जाणे अपेक्षित आहे. भारताकडून “एच 1- बी’ व्हिसाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. हायटेक क्षेत्रात भारतीयांनी दिलेल्या योगदानावर यावेळी विशेष प्रकाश टाकण्यात आला. व्यापार विषयीही उपयुक्त आणि सर्वसमावेशक चर्चा झाल्याचे श्रृंगला यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील व्यापारात निरंतर वाढ होत आहे, त्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. अमेरिकेच्या भारतातील निर्यातीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये 30 अब्ज डॉलर्सवरून 25 अब्ज डॉलर्सपर्यंत कमी झाला होता. मात्र त्यात आता टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे. तेल आणि गॅसबरोबर व्यवसायिक विमानांची खरेदीही भारताकडून केली जात आहे, असे श्रृंगला यांनी सांगितले.
अमेरिका हा भारतातील सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. अमेरिकेच्या एकूण निर्यातीपैकी 12 टक्के निर्यात भारतात होते आहे. भारत हा अमेरिकेसाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पुढे येत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये वस्तू आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. अमेरिकेकडून या क्षेत्रातील तंत्रज्ञान मिळालेले नाही. तसेच काही क्षेत्रांबाबत भारतीय वस्तू आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता अमेरिकेतही आहे. व्यापक व्यापारी कराराबाबत जेंव्हा चर्चा होईल, तेंव्हा या क्षेत्रांबाबत विशेष भर दिला जाईल, अशी माहिती श्रृंगला यांनी दिली.