नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभे राहीले जाउ शकते हा संदेश प. बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाने दिला असल्याचा दावा निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे. सगळी राज्ये आणि प्रादेशिक पक्षांना हा संदेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
किशोर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पंधरा दिवसांत दोनदा भेट घेतली. दुसरी भेट दिल्लीत झाली व त्यानंतर पवार यांनी राजकीय पक्षांना चर्चेसाठी बोलावले. त्यावरून राजधानीत तिसऱ्या आघाडीच्या जुळवाजुळवीची चर्चा सुरू आहे. त्या अनुशंगाने बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, शरद पवारांची भेट घेतली ती त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी.
जेव्हा राजकीय मुलाखती अथवा भेटी होत असतात तेव्हा राजकीय चर्चा होत असतात. पवारांसोबत मी पूर्वी कधी काम केलेले नाही. जेव्हा राजकीय भेटी होतात, तेव्हा राज्यांच्या हिशेबाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणता मुद्दा काम करेल किंवा करणार नाही याबाबत चर्चा होत असते. मात्र त्यात तिसऱ्या आघाडीचा समावेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशांत किशोर यांनी अनेक प्रादेशिक पक्षांना राज्यांत मदत केली आहे. त्यातील काही पक्ष त्या त्या राज्यात सत्तेवर आले आहेत. किंबहुना भारतीय जनता पार्टीलाही त्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मदत केली होती. त्यामुळे ते आता राज्यांच्या बाहेर पडून केंद्रात सक्रिय होण्याचा प्रयत्न करत असल्याचा अनुमान बांधला जातो आहे. मात्र प्रशांत किशोर याचा इन्कार करत आहेत. ते म्हणतात की तिसऱ्या आघाडीचे मॉडेल आता जुने झाले आहे.
सध्या स्थितीत ते मॉडेल फिट बसू शकत नाही. त्यामुळे काहीतरी वेगळी योजना आखावी लागणार आहे. मात्र असे असले तरी ज्यात कॉंग्रेस पक्ष सहभागी नसेल तर त्या योजनेला कितपत मूर्त रूप प्राप्त होऊ शकते? शिवाय प्रादेशिक पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा लपून राहीलेल्या नाहीत. अशात जर एखादा पर्याय उभा केलाही गेला तरी त्यात राज्यांच्या भरवशावर राजकारण करणाऱ्या प्रादेशिक पक्षांना त्याचा नेमका लाभ काय होणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.