मुंबई: केंद्र सरकारने दहशतवादाचे कंबरडे मोडण्याच्या हेतूने सन 2016 साली नोटबंदी केली, त्यानंतर कलम 370 रद्द करून त्या राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी केली. पण या साऱ्या प्रयत्नांनंतरही जम्मू काश्मीरातील स्थिती सुधारलेली नाही अशी टीका शिवसेनेने केली आहे.
केंद्रात सशक्त सरकार असूनही आणि हा प्रदेश आता केंद्रशासित झालेला असतानाही तेथे शांतता का प्रस्थापित होत नाही असा सवाल शिवसेनेने आपल्या मुखपत्रातील अग्रलेखात केला आहे.
त्यात नमूद करण्यात आले आहे की आजही दररोज काश्मीरात रक्तपात होत आहे. सामान्य नागरीकांच्या हत्या होत आहेत. नोटबंदी करण्यात आलेली असतानाही तेथे दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये खंड पडलेला नाही.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक सीआरपीएफ जवान आणि एका ज्येष्ठ नागरीकाचा नुकताच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, त्या घटनेचाही संदर्भ यात देण्यात आला आहे. या साऱ्या
स्थितीची थेट जबाबदारी केंद्र सरकारवरच जाते असेही त्यांनी म्हटले आहे.
काश्मीरात दहशतवाद्यांचा खात्मा केला जात असला तरी त्यांच्याकडून आपल्या जवानांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी नाही याकडेही शिवसेनेने लक्ष वेधले आहे. देशाच्या पाकिस्तान आणि चीन या दोन्ही सीमांवर आज तणावाचे वातावरण आहे, ही चिंतेची बाब आहे असेही शिवसेनेने म्हटले आहे.