नवी दिल्ली – नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दिल्ली सरकारने रात्रीच्या संचारबंदीबाबतचा निर्णय आज उच्च न्यायालयामध्ये सांगितले.
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्ली सरकारकडून पुरेशी खबरदारी घेतली जात असून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत, असे दिल्ली सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात सांगितले. करोनाशी संबंधित मार्गदर्शक सूचनांचा भंग करणाऱ्या नागरिकांकडून आतापर्यंत 17 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 2 लाख चलन फाडली गेली आहेत.
हा दंडाचा निधी कोविड-19 प्रतिबंधाच्या उपाययोजनांसाठी वापरला जाणार आहे. निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी दिल्लीमध्ये 189 पथके कार्यरत आहेत. याशिवाय पोलिसांची 255 वाहने आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी 145 प्रशासकीय वाहनेही सक्रिय आहेत. करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास दफन आणि अंत्याविधीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये सध्या लागू असलेल्या निर्बंधांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत निर्बंधांबाबत कोणताही बदल केला जाणार नाही, असेही दिल्ली सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले.
दिल्लीतील करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या जाव्यात, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी दिल्ली सरकारने ही माहिती दिली. या प्रकरणावरील पुढील सुनावणी 14 डिसेंबर रोजी होणार आहे.