चंद्रपूर – राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात करोनाला शिरकाव करू दिलेला नाही. चंद्रपूर जिल्हा करोनामुक्त आहे, असा दावा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबात विजय वडेट्टीवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे माहिती दिली. ते म्हणाले, काही प्रसार माध्यमांमध्ये चंद्रपूरमध्ये करोनाचा बाधित रुग्ण असल्याचे प्रसारित करण्यात आले आहे. मात्र, आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातून जितके नमुने पाठवण्यात आले, त्या सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. या घडीपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात नाही. चंद्रपूर जिल्हा हा पूर्णतः करोनामुक्त आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये ज्या रुग्णाबद्दल माहिती दिली जातेय तो रुग्ण इंडोनेशियामध्ये तीन महिन्यांपूर्वी गेलेला चंद्रपूर जिल्ह्यातील व्यक्ती आहे. तो इंडोनेशियातून परत आल्यानंतर त्याचे कुटुंब नागपूरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याचा कोडही नागपूरचाच नोंद झाला आहे. त्याचा संबंध चंद्रपूर जिल्ह्याशी नाही.त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्यापर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की, प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे आणि सूचनाचे पालन करावे. आपल्या जिल्ह्यात करोनाला प्रवेश करू देणार नाही, हा विश्वास तुमच्या मनात ठेवा, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.