चीनला मात्र फटका बसल्याची माहिती
पुणे – जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या “करोना’चा फारसा परिणाम देशाच्या साखर निर्यातीवर झाला नसल्याचे चित्र आहे. चीन वगळता इतर सर्व देशांमध्ये साखर निर्यात नियमित सुरू असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले. चीनला होणारी निर्यात मात्र थांबली आहे. पण, इतर देशांच्या तुलनेत चीनला अत्यल्प साखर जात असल्याचे त्याचा फटका भारतातील साखर उद्योगाला बसण्याची शक्यता नसल्याची शक्यता निर्यातदार सूत्रांनी व्यक्त केली आहे.
करारानुसार साखर बंदरात पोहोचविणे व ती जहाजातून संबंधित देशांना पाठवण्याचे काम नियमित सुरू असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. चीनला भारतातून दरमहा दहा ते पंधरा हजार टन पांढरी साखर निर्यात होते. ती इतर देशांच्या तुलनेत कमी असली, तरी त्यावर मात्र काहीसा परिणाम झाल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले. चीनमध्ये कच्ची साखर निर्यात केली जाते. सध्या ती होत नाही. आता पक्क्या साखरेचे करार झाले आहेत. इतर देशांच्या तुलनेत साखरेचे करार कमी असले, तरी करार झालेली साखर मात्र चीनकडे पाठवणे सध्या तरी शक्य नसल्याची परिस्थिती आहे.
सध्या बहुतांशी करून आखाती देशांत साखरेची निर्यात होत आहे. कारखान्यांनी केलेल्या करारानुसार साखर निर्यातीची लगबग सुरू आहे.