पंडीत दीनदयाळ उपाध्याय विमा कवच योजना रेंगाळली
पुणे – नियमित मिळकतकर भरणाऱ्या मिळकत धारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांपर्यंत विमा कवच देण्याच्या पं. दीनदयाळ उपाध्याय विमा कवच योजनेसाठी विमा कंपनीची नियुक्ती करण्यासाठी फेनिविदा काढण्यात येणार आहे. या योजनेची मागील वर्षीची मुदत 27 मे रोजी संपुष्टात आली असून अद्याप नवीन कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने विमा कंपनीची नियुक्ती होईपर्यंत कुठल्याही मिळकतकर धारक अथवा त्याच्या कुटुंबीयासोबत अनुचित घटना घडल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे यातून स्पष्ट झाले आहे.
महापालिकेने दोन वर्षांपूर्वी पं. दीनदयाळ उपाध्याय विमा कवच योजना सुरू केली. आर्थिकवर्ष सुरू होताना 1 एप्रिल ते 31 मार्च अशी या योजनेची मुदत आहे. मात्र, 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कंपनी नियुक्तीचा प्रस्ताव वेळेत मंजूर न झाल्याने “दि. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी’लाच “एक्सटेशन’चे पत्र देण्यात आले होते. आचारसंहिता संपल्यानंतर 28 मे रोजी निविदेनुसार पुन्हा याच कंपनीला काम देण्यात आले होते.
दरम्यान, याची मुदत यावर्षी 27 मे रोजी संपली आहे. यानंतर जूनमध्ये प्रशासनाने विमा कंपनी निुयक्तीसाठी निविदा काढली. 26 जूनला या निविदेची मुदत संपली. यामध्ये दोनच कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यातील एक कंपनी दि. युनायटेड इन्शुरन्स कंपनी ही या योजनेसाठी पात्र ठरली. मात्र, आजतागायत “ब’ पाकीट उघडलेच नाही. काही तांत्रिक कारणास्तव प्रशासनाने ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
पॉलिसी रिन्युअलचा कालावधी…
आगाऊ सूचनेशिवाय अथवा पॉलिसी संपल्यानंतर पॉलिसी रिन्युअलसाठी आठ ते दहा दिवसांचा अवधी विमा कंपन्यांकडून देण्यात येतो. परंतु, हा कालावधी दोन महिन्यांपेक्षा अधिक झाल्याने कोणतीही कंपनी मागील तारखेपासून एक्स्टेंशन देत नाहीत, अशी माहिती विमा क्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे. त्यामुळे फेरनिविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष प्रिमियम भरेपर्यंतच्या कालावधीमध्ये या योजनेसाठी पात्र असलेल्या मिळकतधारकाच्या कुटुंबात अनुचित घटना घडल्यास त्यांना या योजनेचा लाभ होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.