मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर केलेले आरोप हे हास्यास्पद आहे. देशाच्या इतिहासात अनेक जण गृहमंत्री झाले पण आतापर्यंत कुणालाही तडीपार करण्यात आले नाही, असे म्हणत शरद पवार यांनी शहा यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, जेव्हा अमित शहा गुजरातमध्ये राहू शकत नव्हते तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे सहकार्य घेतले.अमित शहांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे उत्तर देतील.
1978 मध्ये मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. तेव्हा शहा राजकारणात होते का नाही माहिती नाही. पण त्यावेळी जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील यांच्यासह अनेक नेते माझ्या मंत्रिमंडळात होते. जनसंघाची पार्श्वभूमी असणाऱ्या अनेकांनी माझ्यासोबत काम केले आहे. 40 वर्षांपूर्वी टीका करणारे गृहमंत्री कुठे होत माहिती नाही. त्याकाळात नेत्यांमध्ये सुसंवाद होता. आता नेत्यांमधील संवाद हरवला आहे.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही कर्तृत्वान व्यक्ती, स्वातंत्र्यानंतर अत्यंत प्रभावी आणि सर्व राज्यांना एकत्रित करण्याचे काम सरदार पटेल यांनी केले. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशचे पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी देशाचे गृहमंत्री सांभाळले. महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या सर्वांनी पदाची गरीमा आणि प्रतिष्ठा ठेवली, असा निशाणाही पवारांनी शहांवर साधला.
कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे शामभटाची तट्टाणी
गृहमंत्र्यांनी जे भाषण केले. मी आणि उद्धव ठाकरेंवर जे भाष्य केले त्यावर न बोलले बरे. मराठीत एक म्हण आहे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी अशी म्हण आहे. भूजला भूकंप झाला. मुख्यमंत्र्यांची बैठक पंतप्रधानांनी बोलावली. त्यात एक प्रश्न निर्माण झाला. ही संकटे येत आहेत.अतिवृष्टी आणि महापूर, भूकंपाचे धोरण ठरवले पाहिजे. त्यासाठी वाजपेयी यांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी विरोधी पक्षात असताना मंत्र्याचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुपूर्द केले. ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्याकडे आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.