नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी सीमेवरील स्थितीबाबत पाकिस्तानशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. चीनबरोबर चर्चा होते; मग दुसऱ्या शेजारी देशाशी का नाही, असा सवाल यांनी शनिवारी लोकसभेत विचारला.
केंद्र सरकारने मागील वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. त्या निर्णयामुळे कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी अब्दुल्ला यांच्यासह जम्मू-काश्मीरातील बहुतांश नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले. चालू वर्षी मार्चमध्ये अब्दुल्ला यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर अब्दुल्ला यांना लोकसभेत प्रथमच बोलण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तान सीमेलगतच्या स्थितीचा मुद्दा उपस्थित केला.
दोन्ही देशांच्या सैन्यांमधील सीमेवरील चकमकी वाढल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांचा जीव जात आहे. ती स्थिती सुधारण्यासाठी मार्ग काढला जावा, असे त्यांनी म्हटले. विकासासाठी जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आल्याची भूमिका केंद्र सरकारकडून घेण्यात आली. त्याचा समाचार घेताना कुठली प्रगती दिसत नसल्याचा शाब्दिक टोला त्यांनी लगावला.