राजगुरुनगर – खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने अद्याही पंचनामे केले नसल्याने शेतकरी हवालादिल झाला आहे. तरी नुकसानग्रस्तांच्या घरांचे शेताचे व शेतातील पिकांचे पंचनामे तात्काळ करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी नायब तहसीलदार राजेश कानसकर यांनी स्वीकराले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती अरूण चांभारे, पश्चिम विभागीय सरपंच संघटनेचे संघटक पांडुरंग जठार, वाघू सोसायटीचे अध्यक्ष शिवराम साबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. खेडच्या पश्चिम भागात आतापर्यंत सुमारे 3 हजार मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्या अनेक वर्षातील हा सर्वाधिक पाऊस आहे. मात्र, महसूल विभागाचे पर्जन्यमापन केंद्र या भागात नसून वाडा येथे आहे तेही नादुरुस्त असते त्यामुळे नक्की पाऊस किती झाला याबाबत नोंद होत नाही. वाडा, भोरगिरी हे अंतर 20 किलोमीटर पेक्षा अधिक आहे. भोरगिरी येथे दरवर्षी सुमारे 2500 ते 3 हजार वाडा परिसरात 800 ते 900 मिलीमीटर पडत असल्याने अतिवृष्टी झाल्याने भात उत्पादक शेतकरी व नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई मिळत नाही. भोरगिरी परिसरात महसूल विभागाचे पर्जन्यमान केंद्र सुरु करण्याची मागणी गेली अनेकवर्षे याभागातील शेतकरी नागरिक करीत असून महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.