पुणे -शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुदत शुक्रवारी (दि.29) संपणार आहे. मात्र राज्यातील जवळपास 36 हजार मुलांनी प्रवेश घेतले नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळणार का, अशी विचारणा पालकांकडून होत आहे.
आरटीईअंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांचे मोफत प्रवेश केले जातात. या प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांना प्रवेश घेण्यासाठी दि. 29 एप्रिलपर्यंत मुदत आहे.
मात्र, प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पालकांकडे उपलब्ध नसल्याने अनेक पालकांना मुलांचे प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्यात प्रवेश जाहीर झालेल्या 90 हजार 685 मुलांपैकी 54 हजार 287 मुलांनी शाळांमध्ये प्रवेश घेतले आहेत.
साधारण 36 हजारांपेक्षा अधिक मुलांचे प्रवेश होणे बाकी असल्याचे स्पष्ट होत आहे. पुणे जिल्ह्यात 14 हजार 958 मुलांना प्रवेश झाले आहेत. त्यापैकी नऊ हजार 355 मुलांचे प्रवेश निश्चित झाल्याने साधारण पाच हजार मुलांचे प्रवेश होणे बाकी आहे.