पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये झालेल्या चकमकीनंतर एका भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आणि अपेक्षेप्रमाणे भाजपने हा विषय उचलून धरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस सरकारच्या कार्यक्षमतेवर आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला.
गेल्या वर्षभराच्या कालावधीपासून भाजपने पश्चिम बंगालमध्ये आपला प्रभाव वाढवण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात केल्यानंतर तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते यांच्यातील चकमकी आणि या चकमकीत झालेले मृत्यू या काही नवीन घटना आहेत, असे मानता येणार नाही. 2021 च्या पूर्वार्धात पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक होणार असल्याने भाजपला या राज्यामध्ये आपला प्रभाव वाढवायचा असल्याने त्यांना या प्रकारची आंदोलने अपेक्षितच आहेत. दुसरीकडे भाजपच्या निवडणूक राजकारणाची कल्पना ममता बॅनर्जी यांनाही असल्याने त्याही भाजपच्या या आव्हानाला तोंड देण्याच्या पूर्ण तयारीत आहेत.
नुकतीच हैदराबादच्या महापालिकेची निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीमध्ये भाजपाने ज्याप्रकारे आक्रमक प्रचार केला आणि या महापालिकेमध्ये चार सदस्यांवरून 48 सदस्यांपर्यंत उडी मारली त्याच प्रकारचा फॉर्म्युला इतरत्रही वापरण्याचा भाजपचा विचार असेल, तर त्यात चुकीचे काही म्हणता येणार नाही. खरे तर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल कॉंग्रेस पक्ष एकेकाळी भाजपचा मित्रपक्ष होता. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीमध्ये तृणमूल कॉंग्रेस हा एनडीएचा घटक पक्ष होता. नंतरच्या कालावधीमध्ये ममता बॅनर्जी यांनी एनडीए पासून काडीमोड घेऊन स्वतःच्या पक्षाचे महत्त्व वाढवण्यास प्रारंभ केला आणि त्यात त्यांना यश आले.
तृणमूल कॉंग्रेसने स्वतःच्या बळावर पश्चिम बंगालसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यामध्ये सत्ता मिळवली. ज्या राज्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाने दीर्घकाळ सत्ता उपभोगली होती आणि कम्युनिस्टांचा उदय होण्यापूर्वी कॉंग्रेसने सत्ता उपभोगली होती त्याच पश्चिम बंगालमध्ये आज दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आणि कॉंग्रेस यांचा प्रभाव अत्यंत मर्यादित राहिला आहे, हीच आश्चर्याची गोष्ट म्हणावी लागेल. ममता बॅनर्जी यांना आव्हान देऊन पुन्हा सत्तेवर येणे एवढी ताकत दोन्ही कम्युनिस्ट पक्ष किंवा कॉंग्रेस यांच्याकडे नाही. साहजिकच पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीची जाणीव भाजपाला असल्याने ही राजकीय पोकळी भरून काढण्यासाठीच भाजपाने पश्चिम बंगालवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. ममता बॅनर्जी यांनाही आता कॉंग्रेस किंवा कम्युनिस्ट पक्ष यांच्यापेक्षा भाजपाच प्रमुख प्रतिस्पर्धी वाटत आहे, हेच भाजपाच्या या निवडणूक धोरणाचे यश मानावे लागेल.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी मोठ्या प्रमाणावर यश मिळवून सर्व पक्षांचे तोंड बंद केले होते. 294 सदस्यांच्या विधानसभेत तृणमूल कॉंग्रेसला 200 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष यांना तीसचा आकडाही ओलांडता आला नव्हता. भाजपला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. गेल्या निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या या तीन जागा हेसुद्धा मोठे यश मानले जात होते. या तीन जागांच्या आधारावर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारण्याची आशा भाजपचे नेते बाळगून आहेत. राज्यातील इतर राजकीय पक्षांनी अद्याप कोणतीही तयारी केली नसताना भाजपाची संपूर्ण निवडणूक स्ट्रॅटेजी तयार आहे.
निवडणूक राजकारणाच्या मॅनेजमेंटचा अनुभव असणाऱ्या मुख्य नेत्यांना प. बंगालमध्ये पाठवण्यात येत आहे. भाजपचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांनी जी बूथ मॅनेजमेंटची कल्पना राबवून भाजपाला विविध राज्यांमध्ये यश मिळवून दिले होते, या योजनेच्या आधारे पश्चिम बंगालमध्ये या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवण्याचा विश्वास भाजपला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून ममता बॅनर्जी यांनी नेहमीच नरेंद्र मोदी यांना थेट विरोध केला आहे. मोदी सरकारने तयार केलेल्या आणि घोषित केलेल्या कोणत्याही योजनांची अंमलबजावणी पश्चिम बंगालमध्ये करण्यासही ममता बॅनर्जी यांनी नेहमीच नाराजी आणि नाखुशी दर्शवली आहे. मोदी यांच्या दौऱ्यातही ममता सामील होत नाहीत, हाच विषय भाजपासाठी प्रचाराचा ठरण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी सरकारने देशातील गरिबांसाठी अनेक योजनांची घोषणा केली असली, तरी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार या योजना गरिबांपर्यंत पोहोचवू देत नाही या एकाच मुद्द्यावर भाजप प्रचारात उतरेल असे संकेत सध्यातरी मिळत आहेत. अर्थात, भाजपला वाटते तेवढा हा प्रवास निश्चितच सोपा नाही. कारण गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये ममता बॅनर्जी यांनी प. बंगालच्या राजकारणावर आपला मोठा ठसा उमटवला आहे. एक कार्यक्षम आणि तळागाळातील समस्यांची जाणीव असणाऱ्या मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा आहे. भाजपच्या आक्रमक प्रचाराला पुरून उरेल असा आक्रमक प्रचार करण्याचीही ममता बॅनर्जी यांची तयारी आहे. ज्या राज्यात एके काळी भाजपचे नावही नव्हते त्या राज्यात आज एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप उदयाला येत आहे ही गोष्ट निश्चितच कम्युनिस्ट पक्ष आणि कॉंग्रेस यांनी गांभीर्याने घ्यायला हवी.
ज्या राज्यामध्ये या पक्षांची सत्ता होती त्या बंगालमध्ये दोन्ही पक्षांचा संभाव्य विजेता म्हणून उल्लेखही केला जाऊ शकत नाही, हे निश्चितच या दोन्ही पक्षांचे दुर्दैव म्हणावे लागेल. दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आणि कॉंग्रेस या पक्षांची निष्क्रियता भाजपच्या पथ्यावर पडली, तर आश्चर्य वाटायला नको. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट यांना बाजूला सारून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची भाजपला खात्री आहे. ही सर्व परिस्थिती पाहता निवडणुकीच्या राजकारणाचा हा “बंगाली राग’ निश्चितच रंगतदार ठरणार आहे.