मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे, ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकावर अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कामाविषयी माहिती देताना विरोधकांना टोला लगावला आहे.
याप्रसंगी सर्व मान्यवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याप्रसंगी उपस्थित होते. कोविड १९ विषाणू संसर्ग परिस्थितीमुळे, हा कार्यक्रम पूर्णतः दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडला. या प्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले, “आजचा मकरसंक्रांतीचा मुहूर्त चागंला आहे, सर्वांना शुभेच्छा तर देतोच आहे आणि मी नेहमी अशी अपेक्षा करतो की, गोड बोलण्यासाठी तीळ-गुळाची अपेक्षा न करता गोड बोललं तर अधिक चांगलं होतं. आजचा हा कार्यक्रम आहे नेहमी अशा कार्यक्रमच्या वेळेला एक बोललं जातं, तशी एक प्रथा आहे, की आजचा दिन हा सुवर्ण दिन आहे, आजचा दिन सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल, आजहा हा क्रांतीकारक क्षण आहे.
कोणतं विशेषण लावायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. पण एक सर्वसाधरणपणे शासकीय किंवा प्रशासकीय कामाबद्दल समज किंवा गैरसमज असा झालेला दिसून येतो की, कोणतही काम तिळगुळ दिल्याशिवाय होत नाही. आणि आजचा हा कार्यक्रम आहे तो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, म्हणून मी म्हटलं की मुहूर्त चांगला आहे कारण इकडे तिळगुळ न देता सुद्धा काम तर होणारच आहे. पण एक अनुभव नेहमी सरकारी कार्यालयात येत असतो, तिकडे गोड बोलणं तर सोडाच, बोलणं देखील खूप अवघड मानले जाते.
लोकाची साधी कामं असतात, परंतु ती करणं तर बाजुलाच राहीलं, पण साधं उत्तर देखील मिळत नाही. अशावेळी नागरिकांमध्ये एक वैफल्य येतं. मत मागताना जी लोक झुकलेली असतात, ती मत मिळाल्यानंतर मात्र ताठ होतात. ओळखही विसरतात आणि अशा वेळी हा जो कार्यक्रम आपण आजपासून सुरू करत आहोत, तो मी म्हणेन की खरच एक क्रांतीकारक कार्यक्रम आहे.”
तसेच, “मला अभिमान आहे ही आपली मुंबई, माझी मुंबई ही देशातील क्रमांक एकची महापालिका आहे. क्रमांक एकचं शहर आहे. या पद्धतीने जनतेची साधी-साधी कामं होत आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग जर सर्वसामान्यांना होत नसेल, तर मग त्याचा काहीही उपयोग नाही, असं मी मानतो. म्हणून मला अभिमान वाटतोय की, माझी महापालिका या तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्यांच्या आयुष्यात सहजता आणण्यासाठी करते, हे एक खूप मोठं काम आहे.” असेही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवले.
याचबरोबर, “५०० चौरसफुटापर्यंत मालमत्ता कर रद्द करून आपण या वर्षाची सुरूवातच दणक्यात केली. त्यानंतर कालपरवा कोस्टलरोडचं जे काम सुरू आहे मावळा त्याचं थेट प्रेक्षपण. अनेकदा असं होतं की कामं न करता बोलणारी देखील अनेक लोक आहेत. तर, काही लोक काम करतात पण बोलतच नाहीत. मग त्याला आपण असं म्हणतो की जंगल मै मोर नाचा किसने देखा. तर आपण सगळ्यांना दाखवतोय की आम्ही काय करतोय आणि आमचा कारभार हा अत्यंत उघडा आहे. यामध्ये लपवाछपवीसारखं काहीच नाही. जे काय आहे ते तुमच्या सेवेसाठी आम्ही करत आहोत.” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.