नवी दिल्ली, दि. 4-सन 1991 नंतर मध्यमवर्गीयांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे वाहन बाळगणाऱ्यांची संख्या वेगात वाढत आहे. सध्या देशामध्ये 21 कोटी लोकांकडे दुचाकी आहे.
तर चार चाकी वाहनांची संख्या तब्बल सात कोटी आहे. ही माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली. भारतातील लोक पर्यावरणाबाबत जागृत झाले आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यानंतर त्याची देखभाल कमी करावी लागते. तसेच ती किफायतशीर होतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढू लागली असून आतापर्यंत 5 लाख 44 हजार इलेक्ट्रिक दुचाकीची विक्री झाली आहे.
त्याचबरोबर या काळात 54 हजार 252 इलेक्ट्रिक चार चाकी वाहनांची विक्री झाली आहे. तीन ऑगस्टपर्यंत संकलित केलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी उपलब्ध करण्यात आली असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. सीएनजी, इथेनॉल, हायड्रोजन, एलपीजी इत्यादी पर्यायी इंधनावरील वाहनांची विक्री वाढत आहे.
अशा प्रकारची 2 लाख 95 हजार दुचाकी वाहने विकले गेले आहेत. तर पर्यायी इंधनावरील 18 लाख 47 हजार चार चाकी वाहने विकली गेली आहेत. कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी भारत सरकारने राज्य सरकारच्या मदतीने पर्यायी इंधनावरील वाहनांची विक्री वाढावी याकरिता महत्वकांक्षी कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर सध्या देशांमध्ये रस्त्यांची संख्या, लांबी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वाहन बाळगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आगामी काळात भारतात वाहन विक्री वाढण्याबरोबरच भारतात तयार झालेल्या वाहनांची निर्यातही वाढेल.