हिमांशू
दिवाळी खरोखर मजेत गेली. देशात मंदी आहे की नाही, हे कळलंसुद्धा नाही. दिवाळीच्या खरेदीसाठी झालेल्या गर्दीच्या छायाचित्रांसह “कुठाय मंदी?’ असं विचारणारे लेखही छापून आले आणि यंदा व्यवसाय किती टक्क्यांनी कमी झाला, हे सांगणारे व्यापारीही पाहायला मिळाले. असं पुरतं “कन्फ्यूजन’ झालं की मग मजा येते. ही मजेची सवय आम्हाला सोशल मीडियानं लावली. या मजेचा आनंदाशी संबंध असेलच असं नाही. पण विशिष्ट मतावर अडून राहायचं आणि अखेरपर्यंत खिंड लढवायची, ही मजेशीर गोष्ट आहे.
वास्तवापासून जितकं जास्त दूर जाता येईल, तितकी जास्त मजा येते. चटके देणारं वास्तव दूर गेल्याचं समाधान मिळतं. मंदी असेल नाहीतर नसेल; या विषयालाच आपल्याजवळ येऊ दिलं नाही, तर मनात तेजी येते. दिवाळी हा तेजाचा उत्सव आणि मनात तेजी असल्याखेरीज तेज येणार कुठून? या तेजानं माध्यमांचं आणि नवमाध्यमांचं औक्षण करावं आणि आल्या दिवसाला मजेनं सामोरं जावं, यातच सर्वांचं हित समावलेलं आहे.
यंदाच्या दिवाळीत आणखीही एक मजा होती. बेसुमार राजकीय फराळ समोर वाढून ठेवलेला होता. खाऱ्या-गोड्या पदार्थांची रेलचेल होती. निवडणूक संपली तरी मजा संपली नाही, असं सांगत हा फराळ आपल्याला वाढला गेलाय आणि तो लवकर संपेल अशी चिन्हं नाहीत. दिवाळी संपली म्हणून रुखरुख लागायला नको! निवडणुकीच्या आधी सुरू झालेले अंकगणिताचे दिवस जवळजवळ संपले आहेत. ज्यांना-ज्यांना जिकडे-जिकडे जायचंय, ते-ते तिकडं-तिकडं गेलेले आहेत.
आपण कुणाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली, हेही विसरून काहीजणांनी भूमिका घेतल्यात. अंकगणिताबरोबरच या निवडणुकीत बीजगणितसुद्धा पाहायला मिळालं. विजयाची खात्री असलेल्या उमेदवाराला “एक्स’ मानायचं आणि प्रत्यक्ष अधिकृत उमेदवाराला “वाय’ मानायचं. जो निवडून येईल तो आपला, अशीही मांडणी झाली. काही गणितं चुकली; काही बरोबर आली तर काही चुकून बरोबर आली. आता मात्र गणिताचं पुस्तक बंद करून भूमितीची प्रमेयं मांडण्याची वेळ आली आहे.
कुठे दररोज वेगवेगळी वक्तव्यं तर कुठं पूर्ण शांतता, असं वातावरण आहे. काहीजण रोज वेगळं प्रमेय मांडताहेत तर कुणी एकदाच प्रमेय
मांडून दिसेनासे झालेत. पडद्यामागं बरंच काही सुरू आहे. आजचा दिवस तर खूप महत्त्वाचा. काहीजण तर “सौ सुनार की, एक लुहार की’ या दृष्टिकोनातून आजच्या दिवसाकडे पाहताहेत. पण काहीही म्हणा, हा चविष्ट फराळ महाराष्ट्राच्या जनतेनंच बनवलाय आणि ज्याचं क्रेडिट त्याला द्यायलाच हवं. चार-पाच दिवसांचीच नव्हे तर चार-पाच वर्षांच्या करमणुकीची भरभक्कम सोय करून ठेवलीय लोकांनी! मुद्द्यावर कुणीच येत नसेल तर जनतेने का यावं? तीन प्रमुख प्रमेय जनतेने राजकारण्यांसमोर मांडलीत.
प्रश्नपत्रिकेतले सोपे प्रश्न आधी सोडवण्याची परवानगी राजकीय नेत्यांना आहे. पण अवघड प्रश्न ऑप्शनला टाकण्याजोगी परिस्थिती ठेवलेली नाहीये. या अवघड पेपरासाठी काही अनुभवींनी “कोचिंग क्लास’ काढलेत. ऍडमिशन घेण्यापूर्वीच “फ्री नोट्स’ वाटायला सुरुवात केलीय. आपापले अनुभव सांगून “हीच ती वेळ’ या निवडणुकीतल्या सर्वांत अचूक “टॅगलाइन’चं विश्लेषण केलं जातंय. क्लासवाल्यांची भूमिका सल्ल्यापुरतीच राहते की पुढे सरकते, यात खरी मजा आहे!