मुंबई – देशात सध्या सरकार आणि सोशल मीडिया कंपन्यांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरु झाले आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या कंपन्यांच्या नियमांवरून केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये संघर्ष उभा राहिला आहे. केंद्राने ट्विटरला निर्वाणीचा इशारा दिला असून, त्यावरून शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
शिवसेनेचे आपल्या मुखपत्र ‘सामना’तून भाजप आणि ट्विटर संघर्षावर भाष्य केले आहे. भाजपसाठी ट्विटरचे राजकीय महत्व आता संपले आहे. जे ट्विटर कालपर्यंत भाजप किंवा मोदी सरकारसाठी राजकीय लढ्याचा अथवा प्रचाराचा आत्मा होता, ज्याच्या अतिरेकाचा वापर करूनच भाजप आणि मोदींनी 2014 साली निवडणुका जिंकल्या. तेच ट्विटर आता भाजपसाठी ओझे झाले आहे. हे ओझे कायमचे फेकून देण्याच्या निर्णयाप्रत मोदी सरकार आले आहे. कारण आता भाजपविरोधकांनी या माध्यमाचे कोपरे बळकावले आहेत आणि भाजपच्या खोट्या-नाट्या प्रचाराला उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे अनेक ठिकाणी ट्विटरच्या रणमैदानातून भाजपला आणि त्यांच्या सरकारला माघार घ्यावी लागत आहे. अशा शब्दात शिवसेनेने भाजपव निशाणा साधला आहे.
शिवसेनेने म्हटले आहे, “ट्विटर ही काही भारतासाठी जीवनावश्यक वस्तू किंवा अत्यावश्यक सेवा नाही. जगातल्या अनेक देशांत ‘ट्विटर’चा ‘ट’ही लोकांना माहीत नाही. चीन, उत्तर कोरियात ट्विटर नाहीच. आता नायजेरियानेही या समाजमाध्यमाची त्यांच्या देशातून हकालपट्टी केली आहे. ट्विटरवरून आता हिंदुस्तानातही वादळ उठले आहे. कालपर्यंत हे ट्विटर म्हणजे भाजप किंवा मोदी सरकारसाठी त्यांच्या राजकीय लढ्याचा किंवा प्रचाराचा आत्मा होता. आता भाजपला ट्विटरचे ओझे झाले असून, हे ओझे कायमचे फेकून द्यावे या निर्णयाप्रत मोदींचे सरकार आले आहे.
देशातील सर्व मीडिया, प्रचार-प्रसारमाध्यमे आज मोदी सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली आहेत, पण ट्विटरसारखी माध्यमे बेलगाम आहेत. त्यावर मोदी सरकार किंवा भाजपचे नियंत्रण नाही. त्यांना भारताचा कायदा लागू नाही. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने समाजमाध्यमांसाठी एक कठोर नियमावली जारी केली आहे. त्या नियमावलीचे पालन करा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, असा इशारा मोदी सरकारने देऊनही ट्विटरवाले ऐकायला तयार नाहीत. आमचा कायदा व आमचे न्यायालय अमेरिकेत. तुमच्या भूमीचा कायदा मान्य नसल्याचे हे ट्विटरवाले सांगतात.
समाजमाध्यमांवर गेल्या काही वर्षांपासून चिखलफेकीचा, बदनामी मोहिमांचा कार्यक्रम सुरू आहे. त्याची निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य, कथा-पटकथा सर्वकाही भाजपचेच होते. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍप या माध्यमांचा मनसोक्त वापर करण्याची रीत इतर राजकीय पक्षांना माहीत नव्हती, तेव्हा या कार्यात (२०१४) भाजपने नैपुण्य प्राप्त केले होते. त्या काळातील प्रचारात भाजपच्या फौजा जमिनीवर कमी, पण सायबर क्षेत्रांतच जास्त खणखणाट करीत होत्या.
भारतातील ट्विटरसह सर्वच समाजमाध्यमांचे जणू आपणच मालक आहोत व सायबर फौजांच्या माध्यमांतून आपण कोणतेही युद्ध, निवडणूक जिंकू शकतो, विरोधकांना उद्ध्वस्त करू शकतो, असा एकंदरीत तोरा होता,” असा टोलाही शिवसेनेनं भाजपला आणि मोदी सरकारला लगावला आहे.
शिवसेनेने म्हटले आहे, “उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांच्या निवडणुका जिंकल्या व ते करताना राजकीय विरोधकांची यथेच्छ बदनामी करण्यात येत होती. त्या काळात राहुल गांधी यांना ज्या शब्दांत ट्विटर किंवा फेसबुकवर शिवराळ शब्द वापरले गेले ते कोणत्या नियमात बसले? मनमोहन सिंगांसारख्या ज्येष्ठ नेत्यास काय काय विशेषणे लावली?
उद्धव ठाकरे यांच्यापासून ममता बॅनर्जी, शरद पवार, प्रियांका गांधी, मुलायम सिंग यादव अशा राजकारण व समाजकारणात हयात घालविलेल्या नेत्यांच्या विरोधात या ‘ट्विटर’ वगैरेंचा वापर करून बदनामी मोहिमा राबविल्या गेल्या. जोपर्यंत हे हल्ले एकतर्फी पद्धतीने सुरू होते तोपर्यंत भाजपवाल्यांना गुदगुल्या होत होत्या, पण आता त्यांच्या सायबर फौजांसमोर विरोधकांचे त्याच ताकदीचे सैन्य उभे करून हल्ले सुरू झाले, तेव्हा भाजपच्या तंबूत घबराट झाली.
प. बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, डेरेक ओब्रायन या जोडीने ‘ट्विटर’च्या दुधारी तलवारीने भाजपलाच घायाळ केले. बिहार निवडणुकीत तेजस्वी यादवने ‘ट्विटर’च्या माध्यमातून मोदी व नितीश कुमारांना उघडे केले. राहुल गांधी व प्रियांका गांधी या ट्विटरच्या माध्यमातून मोदी व त्यांच्या सरकारला ‘जोर का झटका धीरे से’ देत असतात व त्याचे पडसाद देशभरात उमटताना दिसतात.
जसे उपराष्ट्रपती नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ‘ब्लू टिक’ हटवताच सरकारने ट्विटरशी भांडण सुरू केले. त्यावर राहुल गांधी यांनी शुद्ध हिंदीत ट्विट केले की, ”ब्लू टिक के लिए मोदी सरकार लड रही है – कोविड टिका चाहिए तो आत्मनिर्भर बनो!”हा शब्दबाण घायाळ करणारा आहे.
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना अर्धा तास वाट पाहायला लावली यावर भाजप, पंतप्रधान कार्यालयाने नाराजी व्यक्त करताच तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विटरवर झोकात लिहिले, ”मोदीजी, देशाची जनता गेल्या सात वर्षांपासून खात्यात १५ लाख जमा होण्याची वाट पाहत आहे. आपणास अर्धा तास वाट पाहावी लागली तर मनावर का घेता?” हे व असे अनेक शब्दबाण सरकार किंवा भाजपवर सुटत आहेत आणि भाजप त्याबाबतीत आक्रोश करीत आहे,” असा टोलाही शिवसेनेने भाजपला लगावला.