ओवेसींचा बाबरी मशिद विध्वंस प्रकरणावरून सवाल
नवी दिल्ली : देशातील अत्यंत संवेदशनशील असणाऱ्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयात वादग्रस्त जमिन ही हिंदुंना देण्यात येणार आणि अयोध्येतच मुस्लिमांना मशिद बांधण्यासाठी 5 एकर जागा देण्यात येणार यावे असा आदेश न्यायालयाने दिला. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयावर एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी आता जर अयोध्येतील बाबरी मशिद बेकायदा होती तर मग ती पाडण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला आहे आणि जर बाबरी मशिद कायदेशीर आहे तर मग ती जागा लालकृष्ण आडवाणी यांच्या हिंदूत्त्ववादी पक्षकारांना का दिली जाते आहे, असे दोन प्रश्न ओवेसी यांनी विचारले आहेत.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर ओवेसी म्हणाले, जर कोणी येऊन तुमचे घर पाडले. त्यानंतर तुम्ही न्यायालयात गेला आणि न्यायालयाने ज्यांनी तुमचे घर पाडले त्याला ती जागा देऊन टाकली आणि त्याबदल्यात तुम्हाला दुसरीकडे जागा दिली तर तुम्हाला कसे वाटेल? यावरूनच एक मूळ प्रश्न निर्माण होतो की जर बाबरी मशिद बेकायदा होती तर मग ती पाडल्याबद्दल लालकृष्ण आडवाणी यांच्यावर गुन्हा का दाखल झाला आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिला. वादग्रस्त 2.77 एकर जागा रामलल्ला विराजमान पक्षकारांना म्हणजे हिंदूत्ववादी पक्षाला देण्याचा निकाल न्यायालयाने दिला. त्याचवेळी येथील एकूण परिसरातील पाच एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना असदुद्दिन ओवेसी यांनी वरील प्रश्न उपस्थित केले.