पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मित्रपक्षांच्या मान्यतेने हेमंत रासने यांना कसब्यातून उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत रासने हे विजयी होणार आहेत, विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जर कॉंग्रेस ही निवडणूक बिनविरोध करण्याचे म्हणत असतील तर ते म्हणतील तो उमेदवार देण्याची आमची तयारी असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
गणेश कला क्रीडा मंच येथे कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, “ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधकांना भेटणार आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बिनविरोध निवडणुकीची तयारी दर्शविली आणि ते म्हणतील तो उमेदवार देण्याचीसुद्धा आमची तयारी आहे. उमेदवारी न मिळाल्याबद्दल मनात सल राहणे साहजिकच आहे. भाजपमध्ये कोणीही नाराज नाही. टिळक परिवार हा भाजपसोबत आहे.’
बाळासाहेब थोरात यांचा सन्मान राखू
बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसमध्ये नाराज असून त्यांना भाजपमध्ये येण्याचे आवाहन करणार का, असे विचारले असता बावनकुळे म्हणाले, “थोरात हे भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागत असेल. त्यांचा योग्य तो मानसन्मान राखला जाईल. ते आमचे नेते असतील. मागील काही वर्षांत ज्या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य तो सन्मान दिला आहे.’