पुणे – समान पाणी योजनेचे काम करणाऱ्या एल ऍड टी कंपनीकडून नवीन जलवाहीनीच्या कामासाठी खोदाई करताना मोठया प्रमाणात जुन्या जलवाहीन्या फोडल्या जात असून त्या दुरूस्तही केल्या जात नाहीत. त्यामुळे, वारजे भागात अनेक नागरिकांना या फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे दूषित पाणी जात असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे तातडीनं या कंपनीवर कारवाई करावी अन्यथा नागरिक म्हणून आम्ही स्वत: गुन्हा दखल करू असा इशारा महापालिकेच्या विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी दिला आहे. तसेच कंपनीच्या विरोधात महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रारही केली आहे.
याबाबत बोलताना धुमाळ म्हणाल्या की, संपूर्ण शहरात या कंपनीकडून काम सुरू आहे. तसेच वारजे-माळवाडी परिसरातही काम सुरू आहे. हे काम करताना मोठया प्रमाणात कंपनीकडून नागरिकांना गैरसोय होईल अशा पध्दतीनेच काम केले जात आहे. अनेकदा खोदाई करताना मोठया प्रमाणात जलवाहिन्या फोडल्या जात असून त्या दुरूस्तही केल्या जात नाहीत तसेच खोदाईचे काम झाल्यानंतर ते तातडीनं दुरूस्तही केल जात नाही.
याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही त्यांच्याकडूनही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे, फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे नागरिकांना दूषीत पाणी पुरवठयाचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी तातडीनं कंपनी आणि त्याच्यावर कारवाईकडे दूर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा कंपनी तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यां विरोधात आंदोलन करून पोलिसात तक्रार दाखल करण्याचा इशारा धुमाळ यांनी दिला आहे.