बारामती – राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आल्यास सहाच महिन्यांत संपूर्ण कर्जमाफी करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्रीक्षेत्र कन्हेरी (ता. बारामती) येथे झालेल्या प्रचारसभेत अजित पवार यांनी ही ग्वाही दिली. पवार कुटुंबीयातील सुनेत्रा पवार, पार्थ व जय पवार, रोहित पवार हे याप्रसंगी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, ही विधानसभेची निवडणूक आहे, हिंदुत्व, राममंदिर किंवा 370 कलमांवर बोलण्यापेक्षा शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, बेरोजगारी या सारख्या विषयांवर भाजप-शिवसेनेने बोलावे.
54 वर्षांत कॉंग्रेस सरकारने अडीच लाख कोटींचे कर्ज काढले, या सरकारने पाचच वर्षांत हा टप्पा पार केला. राज्यात गुंतवणूकदारांना गुंतवणूक करावीशी वाटत नाही, बेकारी वाढली आहे, अनेक चुकीचे निर्णय होत आहेत. शेतकरी देशोधडीला लागला आहे. सहकार चळवळ मोडीत काढण्याचे काम सरकारने सुरू केले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडू लागला आहे; मात्र राज्यकर्त्यांना सत्ता मिळविण्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही.
एकनाथ खडसे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याची अवस्था काय झाली हे आपण पाहतो, अनेकांचे पंख छाटण्याचे काम पद्धतशीर सुरू आहे, अनेकांना बाजूला करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे कोणाला निवडून द्यायचे याचा विचार मतदारांनी करायला हवा.
मध्यंतरीच्या राजीनाम्याबाबत दिलगिरी व्यक्त करत बारामतीकरांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याबद्दल पवार यांनी खेद व्यक्त केला. शरद पवार यांच्यावरील आरोपांमुळे उद्विग्न होऊन निर्णय घेतला होता, मात्र शरद पवार यांनी समजून सांगितल्यावर हा निर्णय मागे घेतल्याचे ते म्हणाले.
अजित पवार म्हणाले की….
– राज्यावर कर्जाचा डोंगर युती सरकारने उभा करून ठेवला आहे.
– बेरोजगारी कमालीची वाढली आहे त्याने अर्थकारणावर परिणाम झाला.
– शेतकरी व सहकार चळवळ मोडीत काढण्याचा युतीचा डाव.
– विधानसभेत राज्याच्या प्रश्नांवर बोला देशाच्या नको.
– जलयुक्त शिवार योजनेचे काय झाले, शेततळी का दिली नाहीत.
– सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे
– राज्यातील गुंतवणूक झपाट्याने कमी झाली.
– एक लाखांच्या मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास
– प्रचारात खालच्या पातळीवर जाऊन प्रचार अजिबात नको