पुणे : पुण्यात निर्बंध शिथील केल्यानंतर लोकांकडून पर्यटनस्थळं तसंच बाजारपेठा व अन्य ठिकाणी गर्दी होत असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राग व्यक्त केला आहे. अनेक लोक राज्याबाहेर जात असल्याचे सांगत आहेत. मात्र अशा पुणेकरांना त्यांनी १५ दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल असा इशाराही दिला आहे. पुण्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसे आदेश काढण्याची वेळ येऊ देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले आहे.
“पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधींनी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, खोपोली अशा पर्यटनाच्या ठिकाणी शनिवारी, रविवारी खूप गर्दी होत असल्याचं सांगितलं आहे. इतक्या मोठ्या रांगा लागत आहेत. नागरिक असं का करत आहेत माहिती नाही. नागरिकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
अनेक लोक राज्याबाहेर जाऊ लागले आहेत. देवदर्शनासाठी जात असतील तर आम्ही अडवणार नाही, हा त्यांचा श्रद्धेचा भाग आहे. पण काही जण ट्रेकिंगला वैगेरे जात आहेत. तसे जर झाले तर पुण्यातील लोक जे बाहेर गेले होते ते परत आल्यानतंर त्यांना १५ दिवस क्वारंटाइन करावे लागेल. तसे आदेश काढावे लागतील,” असा इशाराच अजित पवारांनी यावेळी दिला.
दरम्यान, “करोना संकट हळूहळू कमी होत असले तरीही आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद राहतील असा निर्णय घेतला असून सोमवार ते शुक्रवारच दुकानं सुरु राहणार आहेत.
परिस्थिती खूप बिघडली तर त्यात बदल करण्यात येईल. पुणेकरांना शनिवारी आणि रविवारी बंद का असा प्रश्न पडला असेल. कारण महाराष्ट्रात करोना कमी होऊ लागला असला तरी रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, पुणे, कोल्हापूर अशा काही ठिकाणी अद्याप प्रमाण जास्त आहे,” असे अजित पवार यांनी सांगितले .