वितरकांकडून वाहन खरेदीवेळी दोन हेल्मेट देण्याच्या आदेशाला बगल
पुणे – दुचाकी वाहनाची खरेदी केल्यानंतर वाहन वितरकाने खरेदीदाराला अधिकृत कंपनीचे दोन हेल्मेट देणे बंधनकारक केले आहे. या वाहन वितरकाने काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असून हेल्मेट न दिल्यास संबंधित वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करण्यात येऊ नये, याबाबतचे आदेश राज्य परिवहन विभागाने सर्व आरटीओ कार्यालयांना दिले आहेत.
वाहन खरेदी केल्यानंतर संबंधित खरेदीदाराला दोन हेल्मेट देण्याबाबत मोटर वाहन कायद्यामध्ये सांगण्यात आले आहे. वाहनचालकाला हेल्मेट न दिल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याची तरतूद आहे. तसेच, राज्यातील वाढत्या अपघातांची संख्या पाहता न्यायालयानेदेखील याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, याबाबत नागरिकांमध्ये आवश्यक जनजागृती झाली नसल्याचे दिसून येते. दुचाकीस्वाराला झालेल्या अपघातात बहुतांशवेळा हेल्मेट नसल्याने जीव गमवावा लागत असल्याच्या घटना घडतात. या अपघातांची संख्या मोठी आहे. यामुळे न्यायालयानेदेखील वितरकांनी हेल्मेट न पुरविल्यास वाहन नोंदणीवर बंदी घालण्याचा इशारा दिला आहे.
हेल्मेटचा खर्च वितरक का खरेदीदाराच्या खिशातून?
या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागाने दखल घेतली असून दुचाकी उत्पादक आणि विक्रेत्यांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच, याबाबत राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. यामुळे विक्रेत्यांनी हेल्मेट न दिल्यास संबंधित वाहनांची आरटीओ कार्यालयामध्ये नोंदणी केली जाणार नाही. दरम्यान, हेल्मेटच्या खर्चाचा बोजा खरेदीदारांवर पडणार का वितरकांना करावा लागणार याबाबत आदेशात स्पष्टता नाही. परंतु, वाहन खरेदीदारांना हेल्मेट देण्याची जबाबदारी वाहन उत्पादकांची असल्याचे आरटीओतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.