नवी दिल्ली – स्वत:चा “उदो उदो’ करण्यासाठी केंद्र सरकारने व्हॅक्सीन परकीय देशांना दिली नसती तर 100 कोटी लसीकरणचे लक्ष्य सहा महिन्यांपूर्वीच साध्य झाले असते, असा उपरोधिक टोमणा दिल्ली सरकारने लावला आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आज 100 कोटी लोकांचे लसीकरणाचा उत्सव साजरा करीत असलेल्या केंद्र सरकारचा समाचार घेतला. भारताने गुरुवारी 100 कोटी लस लावण्याचे ध्येय साध्य केले. जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक देशांनी भारत सरकारचे कौतुक केले आहे.
दुसरीकडे, विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. केंद्राने स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी परदेशात व्हॅक्सीन पाठविली नसती तर 100 लसीकरणचे लक्ष्य सहा महिन्यांपूर्वीच साध्य झाले असते, असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे.
भारताने 100 कोटी लसीकरण केले ही आनंद आणि अभिमानाची बाब आहे. परंतु, केंद्राने लसीकरणाची व्यवस्था करण्यात दिरंगाई बाळगली नसती आणि विदेशात व्हॅक्सीन पाठविली नसती तर मेडिकल टीमे हे लक्ष्य सहा महिन्यांआधीच प्राप्त केले असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ध्येयप्राप्तीला 130 कोटी जनतेचे यश असल्याचे म्हटले आहे. भारताने आपली क्षमता आणि सामथ्रय दाखवून दिले आहे, असेही ते म्हणाले. कोरोनाचा धोका अद्याप कायम असून आपल्याला एकजुटीने या महामारीचा सामना करायचा आहे. यामुळे मास्क वापरण्याची सवय लावून घेतली पाहिजे, असा सल्ला सुध्दा मोदी यांनी देशवासीयांना दिला आहे.