ऑस्ट्रेलिया मंडळाचा आयसीसीला असहकार; आयपीएलच्या आयोजनाची शक्यता वाढली
मेलबर्न : टी-20 विश्वकरंडकाबाबत निर्णय घेण्यासाठी आयीसीसीने जरी येत्या 10 जूनचा मुहूर्त ठरवला असला तरी यजमान ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने करोनाचा धोका संपुष्टात येईपर्यंत ही स्पर्धा आयोजित करणे धोकादायक ठरेल, असे मत व्यक्त केल्याने आता ही स्पर्धा रद्दच होणार असे संकेत मिळाले आहेत.
या स्पर्धेचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळाल्यानंतर तयारीचे काम जोरात सुरू होते. मात्र, करोनाचा धोका वाढल्यानंतर देशात सहा महिन्यांचे लॉकडाऊन करण्यात आले. ही मुदत येत्या 30 सप्टेंबरला संपत असून विश्वकरंडकाचा सलामीचा सामना 18 ऑक्टोबरला होणार आहे. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व संघांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियात दाखल व्हावे लागणार असून त्यासाठी अद्याप तेथील सरकारने हवाई प्रवासाची परवानगी दिलेली नाही. तसेच करोनाचा धोका कायम असताना यंदाच्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करणे धोकादायक ठरू शकेल, असे मत खुद्द ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने आयसीसीच्या बैठकीत सांगितल्याचे समोर आल्यामुळे ही स्पर्धा आता रद्दच होणार, असे संकेतही मिळाले आहेत.
या विंडोमध्ये बीसीसीआय स्थगित करण्यात आलेली यंदाची आयपीएल स्पर्धा आयोजित करू शकेल याची शक्यता वाढली आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाली तर बीसीसीआयला जवळपास 5 हजार कोटींचा तोटा होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयचा ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळावर दबाव वाढत आहे. ऑस्ट्रेलिया मंडळाने जर सहकार्य केले नाही तर त्यानंतरचा भारतीय संघाचा दौरा रद्द करण्यात येईल असे चित्र दिसू लागल्याने या स्पर्धेच्या आयोजनाबाबत ऑस्ट्रेलिया मंडळाने आयसीसीबाबतच असहकार सुरू केल्याचे समोर येत आहे.
गुरुवारी आयसीसीची बैठक झाली त्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने ही स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्याबाबत असमर्थता व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. करोनाचा धोका कायम असताना ही स्पर्धा आयोजित करणे योग्य नसल्याचे त्यांच्या मंडळाने स्पष्ट केले होते. आता यात जर तथ्य असेल तर येत्या 10 जूनला होत असलेल्या आयसीसीच्या बैठकीतच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
भारताच्या दौऱ्याचे वेळापत्रक संभ्रमात…
ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने जाहीर केलेले भारताविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक पुन्हा संभ्रमात सापडले आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत 10 जूनला आयसीसी जो निर्णय घेईल त्यानंतरच हे वेळापत्रक निश्चित होणार आहे.
करोनाचा धोका कायम राहिला तर या मालिकेतील सामने एकाच शहरात मैदानावर होतील, असे त्यांच्या मंडळाने स्पष्ट केल्याची माहिती बीसीसीआयने सांगितली आहे.