हांडेवाडी, वडाचीवाडी, वडकी गावात ग्रामपंचायत निवडणूक की पालिकेत समावेश
– महादेव जाधव
कोंढवा – पुणे शहरालगत असलेली हांडेवाडी, वडकी, वडाचीवाडी ही गावे पालिकेत घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका रद्द होणार असल्याच्या चर्चेची राळ या गावांत उडू लागली आहे. तर, गाव पालिकेत जाणार नाही, ग्रामपंचायत निवडणूक होणारच, या चर्चेलाही ऊत आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर वर्षभरात गाव पालिकेत गेलेच तर होणारा सरंपच औटघटकेचा ठरू शकतो. परंतु, तरीही सरपंचपदाचा टिळा लावून घेण्यासाठी या गावांत डझनभर इच्छुक आहेत. त्यातही सरपंच झालो की नगरसेवक होऊच, त्यामुळे खर्च वाया गेला तरी चालेल. पण आपल्या नावाचा राजकीय धुराळा करण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत.
पूर्व हवेली तालुक्यातील वडकी, हांडेवाडी व वडाचीवाडी गावच्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे; परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर या गावांमध्ये निवडणुका न घेता प्रशासक नेमण्यात आले. आता, करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने या गावांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
परंतु, ही गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतही शासनाचे परिपत्रक जारी झाल्याने या गावांत पुरता गोंधळ उडाला आहे. गाव पालिकेत जाणार की जाणार नाही, याबाबत कोणीही ठामपणे सांगू शकत नसल्याने सरपंच पदासाठी तयारी केलेल्यांना ग्रामपंचायत निवडणुकीची आस लागली आहे. तर, गावे पालिकेत जाणार, या मुद्द्याचा वापर करून ग्रामपंचायत निवडणुकीतील विरोधकांना बाजूला करण्याची “राजकीय खेळी’ गावपुढाऱ्यांकडून खेळली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करावी की नको? या द्विधा मन:स्थितीत या गावांतील “इच्छुक’ अडकले आहेत.
गाव पालिकेत जाणार की निवडणुका होणार, याबाबत चित्र स्पष्ट होत नसले तरी सरपंच पदासाठी इच्छुकांनी जनमत तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. दिग्गज उमेदवारांना उपसरपंच, बिनविरोध पदाचे आश्वासन देऊन आपापल्या पॅनेलमध्ये खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सध्या, शहरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीत सुमारे 70 लोक बाहेर गावचे व 30 टक्केच गाववाले राहिल्याने प्रस्थापितांची सत्ता उलथून लावण्यासाठी व गावचा विकास करण्यासाठी तसेच लोकांसमोर एक वेगळा पर्याय देण्यासाठी एखाद्या नवख्या मात्र सक्षम नेतृत्वाला संधी मिळू शकते. त्यामुळे या गावांत ग्रामपंचायत निवडणूक झाल्यास जनमत असणारा सरपंच जनतेला मिळणार आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतीची शेवटची निवडणूक एकदा होऊनच जाऊ द्या, प्रत्येकाला जनता आपापली जागा दाखवून देईल. कोण किती पाण्यात आहे हे सर्वांनाच कळेल, अशी चर्चा नागरिकांत आहे.