पालिका हद्दीतील आंबिल ओढ्यातील राडारोडा साफ
कात्रज घाट रस्त्यावरील कचऱ्याने ओढ्याची कोंडी
पुणे – मागीलवर्षी आंबिल ओढ्याला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने यंदा ओढ्यातील कचरा आणि गाळ काढून सफाई केली; परंतु, कात्रज घाटात रस्त्यावरच टाकलेल्या कचऱ्याने ओढ्याची पुन्हा कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंबिल ओढ्याचे पाणलोट क्षेत्र हा कात्रजचा घाट परिसर आहे. येथून वाहून आलेले पाणी हे कात्रज तलाव आणि आंबिल ओढ्यात जाते. या वाहत्या पाण्याबरोबर हा कचरा पावसाने कात्रज तलाव आणि ओढ्यात येण्याची शक्यता आहे. हा गाळ साचल्यामुळे मागील वर्षीच्या घटनेसारखी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागीलवर्षी 25 सप्टेंबरला झालेल्या ढगफुटीमुळे आंबिल ओढ्याला महापूर आला. कात्रजपासून राजेंद्रनगरपर्यंत आंबिल ओढ्याच्या भोवती असलेल्या परिसरात जीवित आणि वित्तहानी झाली.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने यंदा लॉकडाऊन असतानाही आंबिल ओढ्यातील गाळ आणि कचरा काढून टाकला. त्यामुळे ओढ्याचे पात्र भिलारेवाडी, कात्रजपासून अगदी राजेंद्रनगरपर्यंत साफसूफ झाले.
महापालिकेने त्यांच्या हद्दीमध्ये काम केले असले तरी कात्रज तलाव आणि आंबिल ओढ्याचे पाणलोट क्षेत्र असलेल्या कात्रज घाट परिसरातील गावांमधून मोठ्या प्रमाणावर टाकलेल्या कचऱ्याचे काय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कात्रज घाटामध्ये अगदी मांगडेवाडीपासून भिलारेवाडी आणि पुढे घाटामध्ये सुमारे एक ते दीड कि.मी. परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला आहे. यामध्ये अंथरूण, पांघरूण, गाद्या, उशांपासून ते कचऱ्याने भरलेली पोती, प्लॅस्टिक पिशव्या, दारू बाटल्या, थर्माकोलचे बॉक्सेस आणि बांधकामाचा राडारोड्याचा समावेश आहे.
पावसाळ्यात हा सर्व कचरा ओढ्यातून वाहात काजत्रच्या तलावात आणि पुढे आंबिल ओढ्यात येणार हे निश्चित आहे. त्यामुळे महापालिकेने याची वेळीच उपाययोजना केली नाही तर मागील वर्षीसारखी परिस्थिती निर्माण होणार याची शक्यता आहे.
कात्रज घाट परिसरातील कचरा उचलण्यात येईल. कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला विनंती करू. स्थानिकांनीही घाटात कचरा टाकून पर्यावरणाची हानी करणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
– ज्ञानेश्वर मोळक, प्रमुख, पालिका घनकचरा विभाग