नवी दिल्ली – हैद्राबाद सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्येनंतर आंध्रप्रदेशात महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बलात्कार पीडितेला तातडीने न्याय देण्यासाठी आरोप सिद्ध झाल्यास आरोपीला २१ दिवसांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. याला ‘आंध्र प्रदेश दिशा कायदा’ असे नाव देण्यात आले असून बुधवारी आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे.
भारतीय कायद्यामध्ये बलात्काराच्या आरोप सिद्ध झाल्यानंतर फाशीच्या शिक्षेची तरतूद नाही. हे विधेयक मंजुर झाल्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा देणारे आंध्र प्रदेश हे पहिले राज्य ठरणार आहे.
काय आहे ‘आंध्र प्रदेश दिशा कायदा’
यानुसार ७ दिवसांमध्ये तपास आणि १४ दिवसांमध्ये न्यायालयात खटला चालवण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या २१ दिवसांमध्ये आरोपीला शिक्षाही ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळतो. या प्रकरणांसाठी १३ जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. या न्यायालयांमध्ये बलात्कार, लैंगिक छळ, अॅसिड हल्ले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांवर, बालकांवर होणारे अत्याचार यावरील खटले चालवले जाणार आहे.