पुणे – करोनाचा प्रसार वाढत असताना नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. यावर उपचार नसल्याने याबाबत उच्च वर्गात सजगता असताना सामान्य तसेच दादि्य्र रेषेखालील वर्गात मात्र यावरील खर्चामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे सर्दी, खोकला असे आजार असताना अशा लोकांकडून औषधोपचारांसाठी खासगी दवाखान्यात गर्दी होत आहे. आपल्यात करोनाची लक्षणे नाहीत ना? आपल्यामुळे कोणाला हा आजार होऊ नये म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी लोक डॉक्टरांकडे जात आहेत. परंतु, अशा लोकांची संख्या वाढत असल्याने उपनगराच्या काही भागातील खासगी डॉक्टरांनी आपापले क्लिनीकच बंद केली आहेत. यामुळे साध्या सर्दी, खोकल्यावरही औषध मिळणे कठीण झाले आहे.
जनता वसाहतीत अशीच परिस्थिती निर्माण झाली असून येथील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे एकूण 108 गल्ल्या असून 14 हजार घरे आहेत. येथे लाखोंच्यावर लोकसंख्या आहे येथील जनता कष्ट करून हातावरती पोट असणारी आहे. येथे शासकीय जनता दवाखाना आहे परंतु, कोणत्याही प्रकारची सुविधा नाही.
विशेष म्हणजे आरोग्य यंत्रणेचे पूर्णत: दुर्लक्ष असून करोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही काळजी घेतली जात नाही. आतापर्यंत कोणतीही कीटकनाशक फवारणी येथे करण्यात आलेली नाही. या दाटीवाटीच्या वस्तीत एखादा जरी रुग्ण सापडला तर संपूर्ण पुण्यात करोनाचा प्रसार रोखणे कठीण होऊ शकते.
सध्या, तरी येथील सुरक्षा दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, सपकाळ, लोहार, पवार मेजर, कळसकर मेजर, नारवडकर आणि वाघे यांच्यासह स्थानिक रहिवासी आणि अखिल जय भवानी जनता वसाहत कृती समितीचे सुरज लोखंडे, समीर पवार, अमोल साळुंखे, निलेश पवार, गणेश पोळेकर, सुभाष धिंडले, हमीद इनामदार, शंकर मोरे, मनोज चव्हाण, राम चव्हाण, राजा पंधारकर, सुभाष दारवटकर, धनंजय पवार, मुकेश पोटे, बाबा कदम आणि सनी जगताप करीत आहेत.
पुणे महानगरपालिकेने येथील आरोग्य संदर्भातील हे प्रश्न गांभीर्याने घ्यावेत, औषध फवारणी तसेच दवाखाना, डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी यांची पूर्तता करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी सुरज लोखंडे यांनी केली आहे.
मायबाप सरकार…
पुण्यातील सामान्य जनांची सर्वात मोठी वसाहत म्हणून जनता वसाहतीचा उल्लेख होत असला तरी करोनाच्या पार्श्वभूमीवर येथे कोणतीही प्रतिबंधक उपाययोजना अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील काही युवक पुढे आले असून त्यांनी पालिकेच्या कामकाजासंदर्भात थेट राज्य सरकार अर्थातच मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांना निवेदनाद्वारे येथील परिस्थिती कळविली आहे.