नवी दिल्ली – देशातील करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात चार महिन्यांमधील सर्वाधिक ४६९५१ रुग्ण सापडलेत. देशातील रुग्णसंख्या वाढत असतानाच करोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा वेगाने सुरु असून यामध्ये ६० वर्षांवरील व इतर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. अशातच आज केंद्र सरकारने लसीचा दुसरा ‘डोस’ देण्यासंदर्भात राज्य व केंद्रशातीत प्रदेशांना ‘महत्वपूर्ण’ सूचना केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देशात सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत सिरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेकच्या लसी वापरण्यात येत आहेत. नागरिकांना यापैकी कोणत्याही एका लसीचे दोन डोस घ्यायचे आहेत. यापूर्वी दोन ‘डोस’मधील अंतर २८ दिवस असावे असं केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आलं होत.
मात्र आता लसीच्या दोन डोसमधील अंतर किती असावे? याबाबत केंद्र सरकारने राज्य व केंद्रशातीत प्रदेशांना पत्र लिहीत हे अंतर ६ ते ८ आठवडे इतके असावे असं स्पष्ट केलंय. हा नवा नियम केवळ सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीसाठी असणार आहे.
पत्रामध्ये याबाबतची माहिती देताना केंद्र सरकारतर्फे, “वैज्ञानिक पुराव्याच्या आधारावर कोव्हीशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवडे इतके असल्यास त्याची परिणामकारकता वाढते असं आढळून आलं आहे.” असं सांगण्यात आलंय.
दरम्यान, हा बदल केवळ सिरम इन्स्टिट्यूटची लस घेतलेल्यांसाठी असणार आहे. भारत बायोटेकच्या कोव्हीशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतरामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.