कंपन्यांचे काम तलाठी संघटना करणार नाही : नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू
पुणे – नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनीने आपली स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, पीक विमा कंपन्यांचे काम आता तलाठी संघटना करणार नसल्याचे निवेदन औरंगाबाद येथील तलाठी संघटनेने दिले आहे. तलाठी संघटनेच्या मागणीचे लोण राज्यात पसरल्यास पीक विमा कंपन्यांसमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
अवकाळी पावासाने राज्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार कृषी व महसूल विभागाच्या वतीने राज्यात शेती पंचनामे सुरू आहेत. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार तलाठी यांनी नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा ठरवून दिलेल्या विहित नमुन्यात दिला आहे. पंचनामा करण्याचा नमूना एक ते 17 कॉलममध्ये आहे. यातील बरेच काम हे तलाठी संवर्गाच्या निगडित येत नाहीत. त्याबाबतची बहुतांश माहिती पीक विमा कंपनीशी निगडित येत आहे. त्यामुळे तलाठी संघटना पीक विमा कंपन्यांच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
पीक विमा नुकसानीसाठी एनडीआरएच्या निकषाप्रमाणे पंचनामे करणे व या पंचनाम्यांनुसार यादी बनविण्याचे काम औरंगाबादमधील फुलंब्री तालुक्यातील तलाठ्यांनी केले आहे. पुढील विमा कंपनीच्या कामावर तलाठी संवर्ग बहिष्कार टाकत असल्याचे म्हटले आहे. या सर्वबाबी शेतीशी निगडित असल्याने विमा कंपन्यांना सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पातळीवरून देण्यात आल्या आहेत. मात्र, या कंपन्यांकडून शेतकऱ्यांचे वेळेवर अर्ज भरून घेण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. तसेच अद्यापही गेल्या खरिप हंगामातील नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना न मिळाल्याने याची विचारणा शेतकऱ्यांकडून कृषी व महसूल विभागाकडे केली जात असल्याने ती एक डोकेदुखी ठरत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर औरंगाबद जिल्ह्यात विमा कंपन्यांची कामे करण्याची भूमिका औरंगाबाद जिल्ह्यातील तलाठी संघटनेने घेतली आहे.