मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा एकदा लांबला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात महाविकासआघाडीत मतभेद असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारावरून आमच्यात मतभेद नाहीत. योग्यवेळी तारीख ठरेल असं सांगितलं होतं. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री तारीख जाहीर करतील. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल. काँग्रेसची यादी आली नाही. त्यांची चर्चा दिल्लीत होते. ती यादी आली की मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहे.
ऑनलाईन कर्जमाफी नसल्याने भ्रष्टाचार अधिक होईल, असा आरोप भाजप नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी केला होता. यावर जयंत पाटील म्हणाले कि, विरोधात बसल्यावर त्यांना असं बोलणं क्रमप्राप्त आहे. पण आम्ही हेलपाटे न घालता कर्जमाफी देऊ, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी उद्धव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली. त्यांच्यात सुमारे तासभर झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. त्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या सुत्रांनी विस्ताराच्या मुहूर्ताची तारीख सांगितली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री म्हणून कमबॅक होणार असल्याचेही त्या सुत्रांनी सूचित केले.