पुणे – करोना संसर्ग भारत कसा रोखतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्यातही पुण्याकडे सर्वाधिक लक्ष आहे. जर आपण त्यात यशस्वी झालो, तर हे “पुणे मॉडेल’ ठरणार आहे, असे आवाहन करतानाच “प्रायोगिक तत्त्वावर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामागे नागरिकांची अडचण करणे हा हेतू नाही. हळूहळू आणखी कडक निर्णय घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
करोना रोखण्यासाठी गर्दी टाळणे हा प्रभावी उपाय आहे. त्या दृष्टीने जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यातून गैरसोय होऊ लागली आहे, तशा तक्रारी आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बोलत होते. “अजूनही काही कडक पावले उचलावी लागणार आहे.
कदाचित सध्या पेक्षा दहापट कडक त्या उपयोजना असतील. त्यामुळे एकमेकांना सहकार्य करण्याशिवाय पर्याय नाही. या विषाणूचा संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, हे जर सुज्ञ पुणेकरांना सांगावे लागत असेल, तर ते योग्य नाही. कारण, पुण्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.’
हद्दी बंद करण्याची निव्वळ अफवा
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात काही भाग “हाय रिक्स एरिया’ म्हणून जाहीर केल्याचा संदेश फिरवला जात आहे. त्यावर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, “हा चुकीचा मेसेज आहे. तो आम्ही दिलेला नाही. त्यासंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या असून, तो मेसेज टाकणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.’ तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हद्दी बंद करण्यात येणार असल्याबाबतची चर्चा ही अफवा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.