एसपीजी सुरक्षेवरून देशात गोंधळाचे वातावरण
नवी दिल्ली : देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात आलेल्या एसपीजी सुरक्षेचा दरवर्षी आढावा घेतला जातो. नुकताच याचा आढावा घेण्यात आला. त्या संदर्भातील एक वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रात छापून आले आहे. त्यानुसार, गांधी कुटुंबातील नेत्यांना यापुढे परदेश दौऱ्यावर जाताना सोबत एसपीजी सुरक्षेतील जवान घेऊन जाणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
जर त्याला विरोध करण्यात आला तर या कुटुंबातील नेत्यांना सुरक्षेच्या कारणास्तव परदेश दौऱ्यावर जाण्यास परवानगी नाकारली जाऊ शकते, असे या वृत्तात म्हटले आहे. तर सरकारने या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच या संदर्भात परस्परविरोधी माहिती पुढे येत आहे.
जर एसपीजी सुरक्षेतील सुधारित नियमांचा अवलंब करण्यास नकार दिला तर गांधी कुटुंबाचे एसपीजी कवचच काढून घेतले जाईल, असे त्यांना सांगण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पण याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. केंद्रीय गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गांधी कुटुंबाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून, त्यांना एसपीजी सुरक्षेऐवजी नॅशनल सिक्युरिटी गार्ड किंवा केंद्रीय राखीव पोलिस दल यांची सुरक्षा पुरविली जावी, असे सूचवण्यात आले आहे.
एसपीजी सुरक्षेचा दरवर्षी आढावा घेतला जातो. यावर्षी घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार गांधी कुटुंबातील सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना जीविताला असलेला धोका कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना एसपीजीऐवजी इतर सुरक्षा पुरविली जावी, असे सूचविण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. या संदर्भात गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नसल्याचे कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रणव झा यांनी सांगितले.