मुंबई – भाजप नेते गणेश नाईक यांच्या एका वादग्रस्त विधानाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली होती. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आझाद काश्मीरपासून ते पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत अनेक विषय आहेत. अशा ट्रकभर चौकश्या कराव्या लागतील, जाऊ द्या ना ताई, असा टोला आशिष शेलार यांनी सुळेंना लगावला आहे.
आशिष शेलार म्हणाले, गणेश नाईक यांनी भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे.. पुजा चव्हाणचा मृत्यू.. अशा ट्रकभर ‘एसआयटी’ कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई, असे पलटवार त्यांनी केला आहे.
तसेच, नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय, असा दावाही आशिष शेलार यांनी केला आहे.
गणेश नाईक यांनी भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत.
आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे..पुजा चव्हाणचा मृत्यू..अशा ट्रकभर “एसआयटी” कराव्या लागतील.
जाऊ द्या ना ताई!
नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 20, 2021
काय आहे प्रकरण?
गुंडांबाबत काही समस्या असल्यास कधीही फोन करा. मला इंटरनॅशनल डॉन ओळखतात. या ठिकाणचे नेते ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा मी प्रिन्सिपल असल्याचे गणेश नाईक म्हणाले होते. हे विधान नाईक यांनी नवी मुंबईत एका सभेत नाईक केले होते.
या विधानावरून सुप्रिया सुळे यांनी गणेश नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. महाराष्ट्रातील एखाद्या आमदाराचे संबंध अशा लोकांशी असतील आणि त्याची जाहीर कबुली ते भरसभेत देत असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची तातडीने चौकशी लावावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.