गुंठ्याला 80 रुपये मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप
मंचर: राज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली पीक नुकसान भरपाईची मदत तोकडी आहे. देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत घसघशीत वाढ करावी. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली आहे. गुंठ्याला 80 रुपये ते एकरी 3 हजार 200 रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांना मिळणारी मदत पुन्हा राज्यपालांना मनीऑर्डर करून पाठवली जाईल, असे बांगर यांनी सांगितले.
प्रभाकर बांगर यांनी राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत आले असून, राज्यपालांनी नुकसान भरपाईची मदत जाहीर केली आहे. खरीप पिकांना हेक्टरी आठ हजार रुपये व फळबागांना हेक्टरी 18 हजार रुपये इतकी तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. राज्यपालांची ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. या मदतीतून शेतकऱ्यांना थोडाही दिलासा मिळणार नाही. कारण झालेल्या नुकसानीचे प्रमाण खूप मोठे आहे.
तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्याच्या राज्यपालांनी केले आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाल्यानंतर तुटपुंजी मदत नाकारण्याचे काम केले जाईल. आलेले पैसे पुन्हा राज्यपालांना मनिऑर्डरद्वारे परत पाठविले जातील. शेतकऱ्यांना द्यायची असेल तर काहीतरी भरीव स्वरुपात मदत करा. हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई जमा होणार असेल तरच ही मदत स्वीकारली जाईल. अन्यथा अनेक शेतकरी ही मदत पुन्हा राज्यपालांना परत करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. या मदतीमध्ये केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारची मदत केल्याचे दिसून येत नाही.
- केंद्र सरकारकडून राज्याला सापत्नपणाची वागणूक
केंद्र सरकारने नेहमीच राज्याला सापत्नपणाची वागणूक दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. या तुटपुंज्या मदतीतून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकरी आणखी संकटाच्या गर्तेत सापडला आहे. या नैराश्यातून जे शेतकरी आत्महत्या करतील. त्यांच्या आत्महत्येला राज्याचे राज्यपाल व केंद्र सरकार जबाबदार असेल, अशा इशारा प्रभाकर बांगर यांनी दिला आहे.