नवी दिल्ली : आपल्या धर्मात पुनर्जन्मावर विश्वास ठेवला जातो. आपण आपल्या पुर्वजांना भेटतो असेही म्हटले जाते, जर सरदार पटेल हे मोदीजींना भेटले तर ते नक्की त्यांच्यावर संतापतील, गांधीजी भेटले तर खेद व्यक्त करतील पण पटेल नक्की राग देतील, अशा शब्दात कॉंग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी टीकेची झोड उठवली.
राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडण्यात आले. त्यावर वादळी चर्चेत सहभाग घेत शर्मा यांनी मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली. या विधेयकाला आमचा विरोध हा राजकीय नाही. तो तात्वीक आहे. कारण या विधेयकामुळे घटनेच्या मुळावरच घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले.
नागरिकत्व कायद्यात 1955पासून सुधारणा अपेक्षित आहे. मात्र त्यात या कायद्यातील मूळ रुपाला बगल देण्याचा प्रयत्न होता कामा नये. तुम्ही राजकारणाबाहेर येऊन यावर विचार करायला सांगता. पण मी तर या मुद्यावर राजकारण करूच नका असो म्हणतो. द्विराष्ट्र सिध्दांत जिना यांनी मांडला नाही तो हिंदु महासभेने गुजरातमध्ये 1937मध्ये मांडला, असे ते म्हणाले.
या सुधारणा आपण पाहतो, त्यावेळी त्यात धर्माचा मुद्दा येतो. त्याला घटनेच्या 14 कलमानुसार मान्यता नाही. त्यामुळे घटनेच्या निकषात हे विधेयक उत्तीर्ण होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. आसाममध्ये इतकी असुरक्षितता का आहे? तेथे लोक निदर्शने का करत आहेत. गृहमंत्र्यांनी एक शिष्टमंडळ घेऊन तेथील परिस्थितीची पहाणी करावी. देशात बेकायदा घुसलेल्यांना ताब्यात ठेवण्याचीॅ केंद्रे उभारली जातील. त्याचा आपण गेल्या शतकातील अनुभवाचा विचार करण्याची गरज आहे., असे शर्मा म्हणाले.