नवी दिल्ली – भारतातील सर्व नागरिकांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे हिंदु आणि मुस्लीम यांच्यात कोणताच भेदभाव नाही, असे जे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे त्यावर कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी तिरकस प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोहन भागवत यांचे विधान खरे आहे असे मानायचे असेल तर आता त्यांनी मुस्लिमांवर अत्याचार करणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांच्या पदावरून हटवून दाखवावे.
मोहन भागवत यांनी काल गाझियाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले होते. मोहन भागवत यांनी काल जी विधाने केली आहेत ती विधाने त्यांनी मोदी शहा यांनाही ऐकवली पाहिजेत, असेही दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. सरसंघालकांनी आपल्या अनुयायांना आपले हे विचार सक्तीने पाळण्याची सूचना केली पाहिजे अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
सरसंघालकांच्या या वक्तव्यावर देशभरातून विविध प्रतिक्रीया आल्या आहेत. एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सरसंघचालकांनी गोवध केल्याच्या कारणावरून मुस्लिमांना ठार मारण्यात आल्याच्या प्रकाराचाही निषेध नोंदवला आहे. तथापि गायीची हत्या झाली आहे की म्हशीची याचीही शहानिशा न करता बेभान जमावाने अनेक मुस्लिमांच्या हत्या केल्या.
त्यांना फक्त ठार मारण्यासाठी जुनैद, अखलाक, पेहलू, राकबर, अलिमुद्दीन अशी नावेच पुरेशी होती. द्वेष पसरवणाऱ्या या हिंदुत्ववाद्यांना सरकारचेच पाठबळ मिळाले आहे असा आरोपही त्यांनी केला. गोडसे विचारसरणीच्या हिंदुत्ववादात केवळ हत्या आणि हिंसाचाराच भाग मोठा आहे, असेही ओवैसी यांनी म्हटले आहे.