मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपवर जोरदार टीका केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे.
याबाबत बोलताना पटोले यांनी, “आरोप तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही केले जातात. मग त्यांचाही राजीनामा घ्या आणि त्यांचीही चौकशी करा”, असा खोचक टोला लगावला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
“अंबानी आणि अदानीसाठी केंद्र सरकार काम करतंय हे सामान्य जनता बोलतेय. मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यायला हवा आणि त्यांचीही चौकशी करायला हवी. लोकशाहीमध्ये जनता सर्वात मोठी असते असं आम्ही मानतो. ते लोक मानतात की नाही माहित नाही”, असं नाना पटोले म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्याही मंत्र्यांवर आरोप झाले होते. त्यावेळी फडणवीसांनी राजीनामे घेतले का? फडणवीसच सर्वांना क्लिन चिट देत फिरत होते आणि तेच न्यायाधीश बनत होते”, असा टोला पटोले यांनी लगावला.