विश्व भूषण हरिचंदन : वर्ल्ड पार्लमेंटचा समारोप
पुणे – आज जगामध्ये आतंकवाद, दहशतवाद, रक्तपात व घातपात यामुळे समाजात अशांती व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशावेळेस भारताने जगाला दिलेला वसुधैव कुटुम्बकमचा संदेशच संपूर्ण मानव जातीला तारू शकेल, असे प्रतिपादन आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्व भूषण हरिचंदन यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्वज्ञानावर आधारित सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटचा समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ईला गांधी, गांधी म्यूझियम लायब्ररीच्या संचालिका डॉ. वर्षा दास, माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार व प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराडसह आदी उपस्थित होते.
राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन म्हणाले, करोना काळात जगात सर्वांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यात आपल्या नेतृत्वाची व नागरिकांची कसोटी पणाला लागली आहे. अशावेळेस लोकशाहीच्या रक्षणासाठी आजच्या तरुणांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे. त्यामुळे एका चांगल्या समाजाची निर्मिती होण्यास वेळ लागणार नाही. देशातील सर्व धर्मातील तत्वज्ञान हे मानवाला जीवन जगण्याचा मंत्र देत असतात. त्यामुळे आपण धारण केलेले नैतिक मूल्ये ही सदैव आपले रक्षण करण्यास समर्थ असतात.