मुंबई – विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे नाना पटोले यांनी आपला राजीनामा सादर केला. पटोले यांच्या राजीनाम्यामुळे अध्यक्षपदाचा पदभार उपाध्यक्ष असलेल्या झिरवळ यांच्याकडे आला आहे.
राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षबदलाच्या हालचालींना वेग आला आणि या पदासाठी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचे समजते. याबाबत कॉंग्रेस हायकमांडकडून लवकरच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसला आता उपमुख्यमंत्री पदाबाबत रस असल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले आहे. यामुळे आजच्या दिवसभरात राजकीय हालचालींना वेग आल्याचे देखील दिसून आलं आहे.
त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रितपणे याला सहमती देणार का ? हे देखील महत्वाचं ठरणार आहे. तसं झाल्यास राज्यात दोन उपमुख्यमंत्री पदाच्या जागा निर्माण होतील. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे. बच्चू कडू महाविकास आघाडी सरकारमधील सत्तेत सहभागी आहेत. ‘दोन उपमुख्यमंत्री होणार नाही. जर असे झाले तर तिसरा उपमुख्यमंत्री अपक्षांना दिला पाहिजे’ अशी मागणी टोला त्यांनी लगावला आहे.