जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन; करोना रुग्णांच्या संख्येत वाढ
पुणे – शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करत बिनधास्त विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर वाढली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या वाढत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला.
पत्रकारांशी राम यांनी व्हर्च्यूअल संवाद साधला.यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पुणे शहर पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम उपस्थित होते. ते म्हणाले, नागरिक विना मास्क फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. गर्दी होत आहे. नागरिक विनाकारण घराबाहेर पडतात. शासनाच्या सूचनांचे पालन होत नाही, या पार्श्वभूमीवर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. नागरिकांकडून नियम न पाळल्यास तर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल.
..तरच स्थिती नियंत्रणात
पोलिसांना आनंद वाटतो म्हणून कारवाई करत नाहीत. पण लोकांच्या हितासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून पोलीस कार्यरत आहेत. पोलिसांनी काल एका दिवसात 498 गुन्हे दाखल केले आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन केले तर करोनाची स्थिती नियंत्रणात आणू शकतो, असा विश्वास पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम यांनी व्यक्त केला आहे.
म्हैसेकर उवाच…
– चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ
– नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश
– मास्क वापराच आणि सॅनिटायझरही वापरा
– औरंगाबादमध्ये 10 ते 18 जुलैपर्यंत संचारबंदी
– राज्यात मुंबई, पुणेपाठोपाठ औरंगाबादमध्ये करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हा संसर्ग रोखण्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी आता प्रशासनाने 10 ते 18 जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.