मुंबई – मागील वर्षभरापासून पूर्णवेळ नेतृत्वाशिवाय असलेल्या काँग्रेसमध्ये आता अध्यक्षांच्या निवडीची मागणी होऊ लागली आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सोनिया गांधी यांनी नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले कि, सोनिया गांधी यांनी काँग्रेसला संकटात सांभाळले आहे. काँग्रेसचा अध्यक्ष गांधी घराण्यातील व्हावा. सोनिया यांच्यानंतर राहुल गांधी हे पद सांभाळण्यास सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच, राहुल गांधी यांच्या इच्छेनुसार महाविकास आघाडीत सहभागी झालो होतो. राहुल गांधी यांनी अध्यक्ष झाल्यावर जर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही बाहेर पडू, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष स्थानी सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या निवडीला आता वर्ष झाले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाला उभारी देण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणीही या नेत्यांनी केली आहे.