मुंबई – विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून झालेल्या अभूतपूर्व गदारोळातच राज्यसभेमध्ये काल कृषीविषयक दोन महत्त्वाची विधेयके आवाजी मतदानात मंजूर झाली. याबाबत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी, ‘आमच्या हातात दगड आहेत व तुमच्या काचा आहेत’ असा संतप्त इशारा केंद्र सरकारला दिला.
शेट्टी यांनी काल राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे उत्पादन व्यापार व वाणिज्य (जाहिरात व सुविधा) विधेयक 2020 आणि शेतकरी (सबलीकरण आणि संरक्षण) किंमत हमी आणि शेत सेवा विधेयक-2020) विधेयकांबाबत भूमिका मांडतानाच एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी थेट केंद्र सरकारला इशारा दिला.
“पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेत शेतकरी विरोधी कायदे समंत करुन घेतलेत. पण त्याची अमलबजावणी कशी करणार हे आम्हाला पहायचं आहे.” असं शेट्टी म्हणाले.
तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत हे लक्षात ठेवा…
याबाबत बोलताना शेट्टी यांनी, “भलेही तुम्ही कटकारस्थान करुन आणि इतर राजकीय पक्षांच्या सहकाऱ्याने शेतकऱ्याला कॉर्पोरेट सेक्टरच्या घशात घातलं. त्याला शहरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हमीभाव हा शेतकऱ्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो जर काढून घेण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस या देशातील करोडो शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील. या दगडांमध्ये तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत हे लक्षात ठेवा.” असा संतप्त इशारा दिला.
पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही कायदा कराल ! पण लक्षात ठेवा सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोपे नाही आमच्या हातात दगड आहेत व तुमच्या काचा आहेत.
राजू शेटटी.@ANI pic.twitter.com/M1nv3rUAwJ— Raju Shetti (@rajushetti) September 21, 2020
तत्पूर्वी, शेतकऱ्यांचे उत्पादन व्यापार व वाणिज्य (जाहिरात व सुविधा) विधेयक 2020 आणि शेतकरी (सबलीकरण आणि संरक्षण) किंमत हमी आणि शेत सेवा विधेयक-2020 ही दोन्ही विधेयके लोकसभेमध्ये गुरुवारीच मंजूर झाली होती. यानंतर काल या विधेयकांना राज्यसभेची मंजुरी मिळाल्याने या दोन्ही महत्त्वाच्या विधेयकांना संसदेची मंजुरी मिळाली आहे.