मुंबई – शिवसेना नसती तर भाजपचे ४०-५० आमदारच असते. मी पुन्हा येईन हा तर चेष्टेचा विषय झाला असल्याचा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले कि, तुम्ही ज्याला प्रमुख पक्ष म्हणताय तो प्रमुख कसा बनला याच्याही खोलात जायला पाहिजे. माझे स्पष्ट मत आहे की, विधानसभेला त्यांच्या आमदारांची १०५ ही जी फिगर झाली त्यात शिवसेनेचे योगदान फार मोठे होते. त्यातून तुम्ही शिवसेना मायनस केली असती, त्याच्यात सामील नसती तर १०५चा आकडा तुम्हाला कुठेतरी ४०-५०च्या आसपास यावेळी दिसला असता. भाजपचे लोक जे सांगतात की, आम्ही १०५ असतानाही आम्हाला आमच्या सहकाऱ्याने म्हणजे शिवसेनेने दुर्लक्षित केले किंवा सत्तेपासून दूर ठेवले. त्यांना१०५ पर्यंत पोहोचवण्याचे काम ज्यांनी केले त्यांनाच जर गृहीत धरण्याची भूमिका घेतली तर मला वाटत नाही की इतरांनी काही वेगळं करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘मी पुन्हा येईन’ म्हणण्यामध्ये दर्प होता. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. राजकीय नेत्याने जनतेला गृहीत धरु नये. भाजपचे ‘आता आम्हीच’ हे लोकांना आवडले नाही, असेही शरद पवार यांनी म्हंटले आहेत.