नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. यात मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपाला पछाडत सलग तिसऱ्यांदा मोठा विजय मिळवला. या विजयानंतर ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. “निवडणूक आयोगाने भाजपा प्रवक्त्यासारखं काम केलं. यावेळी आयोग ज्या पद्धतीने वागला, ते सगळं भयंकर होतं,” असे म्हणत ममतांनी सडकून टीका केली.
पश्चिम बंगालमधील निकालानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. ममता बॅनर्जी म्हणाल्या, ”मला विश्वास होता की आम्ही दोनशेपेक्षा अधिक जागा जिंकू. २२१ जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य होते. पण यावेळी निवडणूक निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागला, ते भयंकर होतं. निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने भाजपा प्रवक्त्यासारखे काम केले,” असा आरोप ममतांनी केला.
“सुरुवातीपासूनच मी सांगत आले आहे की, आम्ही दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकू आणि भाजपाला ७० जागांच्या पुढे जाता येणार नाही. जर निवडणूक आयोगाने त्यांना (भाजपा) मदत केली नसती, तर भाजपाला ५० जागाही जिंकता आल्या नसत्या. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन छेडछाड केलेल्या होत्या. आणि असंख्य पोस्टल बॅलेट रद्द करण्यात आले. पण, मी पश्चिम बंगाल माणसांना सलाम करते. त्यांनी फक्त बंगाललाच वाचवलं नाही, तर देशालासुद्धा वाचवलं आहे,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
संपूर्ण पणाला लावून पश्चिम बंगालच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजपचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलने पुरता धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. बंगालमध्ये भाजप तृणमूल काँग्रेसला कडवी लढत देईल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनीही वर्तवला होता. मात्र, मतमोजणी सुरू होताच हा अंदाज खोटा ठरवत तृणमूल काँगे्रसने मारलेली मुसंडी अखेरपर्यंत कायम राखली.