नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे नागरिकांनी बॅंकात गर्दी करू नये याकरिता भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने 30 जूनपर्यंत एटीएम शुल्क रद्द केले होते. जर बॅंकेने या मुदतीत वाढ न करण्याचे ठरविले तर एक जुलैपासून एटीएम व्यवहारावर शुल्क लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तरी ही कालमर्यादा वाढविण्याबाबत स्टेट बॅंकेने भाष्य केलेले नाही.
स्टेट बॅंकेने एटीएम व्यवहाराकरीता 30 जूनपर्यंत सवलत दिली होती. याचा अर्थ ही मुदत संपल्यानंतर म्हणजे एक जुलैनंतर जुने नियम लागू होतील, असा घेतला जात आहे. एटीएमसंदर्भात विविध बॅंकांचे विविध नियम असतात. त्यामुळे ग्राहकांना आपल्या बॅंकेशी संपर्क साधून जुने नियम लागू होणार आहेत का, याची माहिती घ्यावी लागणार आहे.
तीन महिन्यांच्या काळात स्टेट बॅंकेने स्टेट बॅंकेच्या एटीएममधून आणि इतर बॅंकांच्या एटीएममधून केलेल्या व्यवहारावरील शुल्क माफ केले होते. त्या अगोदर आठ एटीएम व्यवहार मोफत असत. त्यानंतर त्यावर शुल्क आकारले जात होते.