नवी दिल्ली – केंद्र सरकारने खूप पूर्वीच सरकारी मालकीची एअर इंडिया ही विमान कंपनी विक्रीला काढली आहे. मात्र, सरकारने आता कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली आहे.
हरदीपसिंह पुरी यांनी एअर इंडियासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, शक्य झाल्यास सरकार ही कंपनी सुरु ठेवेल. मात्र कंपनीवर ६० हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळेच या कंपनीचे खासगीकरण किंवा ती बंद करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. विमान संशोधन विधेयक २०२० राज्यसभेमध्ये सादर करण्याआधी पुरी यांनी सभागृहाला ही माहिती दिली. एकीकडे कंपनी बंद करण्याचे वक्तव्य करतानाच दुसरीकडे पुरी यांनी या कंपनीला लवकरच नवा मालक मिळेल आणि त्याचे उड्डाण यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.