नवी दिल्ली : देशात डिसेंबर महिन्यात हरिद्वारमध्ये झालेलय धर्म संसदेने एकच वादळ निर्माण केले होते. कारण या धर्म संसदेत हिंदू धर्मगुरूंनी केलेल्या द्वेषपूर्ण भाषणांमुळे नवीन वाद निर्माण झाला होते. त्यानंतर या धर्म गुरूंवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयाने देखील घेतली होती. दरम्यान, आता या प्रकरणी हिंदू सेनेने उडी घेतली आहे. त्यानुसार हिंदू सेनेने सर्वोच्च न्यायालयात धर्म संसदेतील द्वेषपूर्ण भाषणाच्या कारवाईला विरोध केला आहे.
हिंदू सेनेकडून सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जात धर्मसंसद प्रकरणात हिंदूंवर कारवाई होत असेल तर मुस्लीम नेत्यांनाही द्वेषपूर्ण भाषणासाठी अटक करावी, असे म्हटले आहे. याशिवाय हिंदू सेनेला पक्षकार बनवण्याची मागणी अर्जात करण्यात आली आहे.
हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी दाखल केलेल्या या अर्जात असदुद्दीन ओवेसी, तौकीर रझा, साजिद रशिदी, अमानतुल्ला खान, वारिस पठाण यांच्याविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण दिल्याबद्दल एफआयआर नोंदवण्याचे निर्देश राज्य सरकारांना द्यावेत, असे म्हटले आहे. हिंदू अध्यात्मिक नेत्यांनी धर्मसंसद आयोजित करणे हे इतर कोणत्याही धर्म किंवा श्रद्धेच्या विरोधात मानले जाऊ शकत नाही आणि त्यामुळे त्याला विरोध केला जाऊ नये, असेही अर्जात म्हटले आहे.
धर्मगुरूंची विधाने हिंदू संस्कृती आणि सभ्यतेवर गैर-हिंदू समुदायाच्या सदस्यांनी केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून होती आणि अशी उत्तरे द्वेषपूर्ण भाषणाच्या कक्षेत येणार नाहीत, असे म्हटले आहे. जोपर्यंत चौकशी अधिकाऱ्याकडून सविस्तर चौकशी केली जात नाही तोपर्यंत याचिकाकर्त्याने आरोप केलेल्या द्वेषयुक्त भाषणाचा शोध लावता येणार नाही. प्रत्येक विधान हे द्वेषयुक्त भाषण मानले जाऊ शकत नाही.
भारतीय राज्यघटनेने सर्व धर्मांच्या अनुयायांना समान संरक्षण दिले आहे. या अर्जात पुढे म्हटले आहे की, या देशातील प्रत्येक नागरिकाला विवेक, आचरण आणि धर्माचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे. हिंदूंच्या धर्म संसदेचे आयोजन भारतीय राज्यघटनेद्वारे संरक्षित आहे, त्यामुळे याचिकाकर्त्याचे आक्षेप घटनात्मक योजनेच्या विरोधात आणि हिंदूंच्या मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करणारे आहेत.