बारामती (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या २८८ विधानसभा मतदार संघामध्ये ओबीसींनी ठरवले तर २०० च्या वर आमदार ओबीसी समाजाचे निवडून येतील एवढी ताकत ओबीसी समाजा मध्ये असल्याचे मत निरीक्षक राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या निरीक्षक अर्चना पाटील यांनी व्यक्त केले.
ओबीसी समाजातील सर्व घटकांतील युवकांनी एकत्र येऊन समाज परिवर्तन करावे व राजकारण या विषयांकडे गांभीर्याने बघितले पाहिजे, असे झाले तर ओबीसींचे सर्व प्रश्न सुटतील, मराठा आरक्षणाचे बाळासाहेब सराटे यांनी धनगर आणि वंजारी समाजाचे आरक्षण काढून टाका अशी याचिका कोर्टा मध्ये दाखल करण्यात इतपत मजल गेली आहे.
जाती- जातींमध्ये तेड निर्माण करण्याचे काम सराटे सारखी लोक करतात. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे ओबिसींनी यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे.
ओबीसितील सुशिक्षत घटकांनी एकत्र येऊन दबाव वाढवण्याची गरज असल्याचे सांगत महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाला राजकीय व सामाजिक न्यायापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान केले आहे असा आरोप यावेळी डॉ अर्चना पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातींसाठी २५ व अनुसूचित जातींसाठी २९ अशा ५४ आरक्षित जागा आहेत उरलेल्या २३४ जागा पैकी किमान २०० च्यावर ओबीसींचे आमदार निवडून येऊ शकतात. असे मत अर्चना पाटील यांनी व्यक्त केले.