आंबिल ओढ्यात घर वाहून गेलेल्या 26 कुटुंबांना पर्यायच नाही
पुणे – मागील वर्षी 25 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला महापूर आला. यात स. नं. 134 मधील सुमारे 26 कुटुंबांचा संसार आणि घरेही गिळंक़ृत केली. या घटनेस सहा महिने झाले, तरी त्यांना घर मिळण्याची आशा नसल्याने या कुटुंबांचा संसार पुन्हा आंबिल ओढ्यात पूर्वीच्या ठिकाणीच थाटण्यात आला आहे. त्यासाठी मिळालेली मदत, लोकप्रतिनिधींनी दिलेले साहित्य तसेच मिळेल तसा पैसा उभारून घरे पुन्हा उभी केली आहेत. त्यामुळे पुन्हा जीव मुठीत घेऊन ओढ्यातच राहण्याची वेळ या कुटुंबांवर आली आहे.
आंबिल ओढ्याला आलेल्या पुरात या कुटुंबांची घरे वाहून गेली. त्यामुळे या कुटुंबांना धर्मवीर संभाजी महाराज शाळेत ठेवण्यात आले होते. या ठिकाणीही या डोक्यावर छप्पर वगळता इतर काहीच सुविधा मिळत नव्हत्या. त्यामुळे बाधितांनी नाराजी व्यक्त करत महापालिकेवर मोर्चाही काढला. त्याची दखल घेत स्थायी समिती तसेच या नागरिकांना एका महिन्यात घरे देण्याचा ठराव केला. त्यानुसार, “एसआरए’ आणि महापालिकेच्या बैठकांचे सत्रही झाले. मात्र, हे पूरबाधित असल्याने “एसआरए’ने त्यांना घरे देण्यास असमर्थता दर्शवली, तर आयुक्तांनीही नुकतेच त्यांना घर देणे शक्य नसल्याचे शहर सुधारणा समिती तसेच स्थायी समितीला कळवले आहे. त्यामुळे मदत मिळण्याची अपेक्षा नसल्याने या कुटुंबांनी पुन्हा ओढ्यात संसार थाटला आहे.
या कुटुंबांना घर देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. “एसआरए’ आणि पालिकेत तोडगा निघत नाही. तर, याच भागात पुनर्वसन करण्याची त्यांची मागणी आहे. त्यामुळे त्यांना तातडीने घरे देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुरानंतर ही कुटुंबे पालिकेच्या शाळेतच आहेत. त्यामुळे त्यांना तिथून पुन्हा जुन्या घरांच्या जागेत हलवण्यात आले असून, घरे बांधण्यासाठी आवश्यक मदत करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– धीरज घाटे, सभागृह नेते
पुराचा पुन्हा धोका
ही कुटुंबे पुन्हा मूळ जागेत परतली आहेत. त्यामुळे चार महिन्यांनंतर पुन्हा पावसाळ्यात त्यांच्यावर पुराचे संकट कायम असणार आहे. 2018 मध्ये कालवा फुटल्यानंतर या भागात पाणी घुसले, त्यानंतर 2019 मध्ये ओढ्याला पूर आला होता. त्यानंतर पुन्हा पावसाळ्यात अशीच स्थिती उद्भवल्यास या कुटुंबांना पुराचा धोका असणार आहे.